बालवेद प्रतिसाद
कविता समजायला मी टीपा द्याव्या असेही काहींचे मत आहे. 'उद्या लग्न आहे' मधे मी तसे केले होते. यावेळेस तसे करायचा विचार नव्हता. तरी पण अधून मधून मी माझ्याच कवितांवर भाष्य करून येथेच देणार आहे. 'आपली आपण करी जो स्तुती, तो एक मूर्ख' हे खरे असले तरीपण!
-----------
ll अमर्यादित ll
सांगणे कधी संपत नाही, म्हणून करावे लागतात भाग
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद........संपले का वेद?
नाही- नाही....संपणार कसे, आता आला बालवेद
तो तरी एका भागात आहे काय? नाही- नाही.....
त्याचेही झाले की विभागच विभाग.........
आता तरी सांगून झाले का? नाही.....नाही!
कितीतरी होतील प्रभाग
चांगलेच आहे की, सांगणे संपायला नको,
चालणे थांबायला नको, बोलणे खुंटायला नको अविरत..अविरत...अविरत...हाच असावा आयुष्याचा अर्थ
सतत वाचन, मनन, चिंतन, आविष्करण हेच तर जीवन सार्थ
चित्रपटही कितीतरी भागांमध्ये निघतो आहे, आपण पाहतोच ना!
आनंद कधी संपत नाही. आस्वाद घेतोच ना!
माणसाचे मन कार्यरत आहे नेहमीच, म्हणूनच निरनिराळ्या स्वरूपात कलाकृती येतात ना!
किती ह्या कलाकृती? किती ह्या आविष्कृती?
माणूस अखंड शोध घेतोच आहे आयुष्याचा
माणसे तरी किती? निसर्गाची व्याप्ति किती, आकाशात तारे किती? होईल का बरोबर गणती.....सारेच अगणित
प्रत्येकाचे भावविश्व वेगळे.....
मला काही सांगायचेय, म्हणतोच ना!
सांग बाबा सांग.........
आम्हालाही ऐकायचेय, मग त्याच्यावर लिहायचेही.....
अरे बाप रे!
संपता संपतच नाही......
अखंडित.......अखंडित........अखं
गतकाळातल्या किती आठवणी- आठवतातच ना नेहमी
आठवणींना उसंत नाही
आठवते मला आठवी नेहमी!
आठवते कृष्णजन्माष्टमी!
मुकुंद होता आठवा
अनंतात झाला विलीन
मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीलाच
काय काय आठवू? .......
किती.....किती लिहू?......
संपता संपेनाच!
अष्टविनायकांना आठवून
लेखणी ठेवते खाली.
संगीता पाटखेडकर
-----------
आजची सकाळ वेगळीच निघाली. अरूणच्या काही नवीन कविता वाचल्या. वेळेचा अभाव त्यामुळे जास्त लिहीत नाही पण he has unlimited talent.
I just got the feeling that by calling it balved he has taken the responsibility to convey to children all the essence of the other vedas which are actually meant for adults. Not many adults really understand what is written there. It is actually easier for children to understand things in their purer and simpler forms. So that could help. But covering some major aspects of good-bad, right-wrong, material-immaterial, duty, love, attachment-detachment, etc. This is something he can take onto himself and then the balved would be complete.
Sudhir Moharir
3-10-2015
-----------
विश्वासाचा घडा की त्याला गेलेला तडा?
विश्वास - २१ कवितांची जुडी खूपच मार्मिक वाटली. दुर्वांच्या रसावर राहून उपवास करणारा पुढे खूप वैभवसंपन्न झाला अशी एक कथा पूर्वी वाचली होती. बिकट परिस्थितीत दुर्वांच्या रसावर उदरभरण करणारा राजा कोण बरे? अरे हो - राणा प्रताप.
एकूण काय! दुर्वा या खूप बलशाली करणाऱ्या असतात. या २१ दुर्वांच्या जुडीने तुम्हा-आम्हाला तर फारच विषयसंपन्न केले आहे.
कविता खूप आवडल्या. त्यातल्या त्यात चातुर्मास व गुढी या कविता अप्रतिम वाटल्या. काव्य करणे किती कठीण असते हे सणवारांचे वर्णन, उपासतापास, दक्षिणा व अक्षदाम् समर्पयामी या प्रतिमा वापरून विनोदी पद्धतीने फारच प्रत्ययकारी केले आहे. मुळातून कविता वाचा. वर्णन करून सांगण्यात रसाघात होतो. गुढीपाडव्यानंतर रामनवमी, छोटी-मोठी एकादशी, विनायकी-संकष्टी चतुर्थी, गुरुवार-शनिवार, चैत्रगौर (सुंदर प्रतिमा) (वृंदाचे वर्णन- (चैत्रगौर काही केल्या साडीत मावेना), खूप लफ्फेदार साडी, सर्व दागिन्यांची आरास व फुल-हारांनी केलेली सजावट यामुळे मूळ गौरीच्या प्रतिमेपेक्षा ती खूपच फुगवटी वाटते. अभिव्यक्ती निरतिशय सुंदर!)
अक्षय्यतृतीया- चिंचोणी, सांडया-कुर्डया (अक्षयपात्रात तिच्या कुणी या कुणी जा)
वडसावित्री - तीन दिवसांचे व्रत - मोठ्या एकादशीला निर्जळा - सुंदर भावाभिव्यक्ती
चातुर्मास - सणवारांची रेलचेल - पोळा, गौरी-गणपती - करंज्या, साटोऱ्या, पात्यांचे फुलोरे,
दसरा - तांदळाचा रावण, पोटात अंगठी, तलवारीने आंगठी काढून रावण मारण्याचा संकेत (रावणाच्या नाभीत त्याचा प्राण हे बिभीषणाने रामाला सांगितले - ही कथा),
संस्कृतीचा भार हिच्याच खांद्यावर असल्याप्रमाणे सर्व रीतसर पाळणारी. होळीची राख अंगाला लावून केलेले स्नान. संस्कृतीच्या दर्शनाने सूर्याला कौतुक म्हणून तो उजळून निघतो असे वर्णन. नरकचतुर्दशी - टिपूर पौर्णिमा (विस्मयाने पूर्ण चंद्र पाहे आकाशीचा । संस्कृतीचा ऱ्हास धरेवर ना व्हायाचा), तुळशीचे लग्न - होळी - पुन्हा गुढीपाडवा (सर्व सण करणारी गृहिणी वृंदा समजू - सर्व पदार्थ येणे हे वैशिष्ट्य नव्हे काय?).
सर्व सणावारांचे कवीला अगदी इत्थंभूत ज्ञान- वारशाने मिळालेले. कोणत्या सणाला काय केले जाते हे सर्व किती नेकीने पाहिले असेल हे दिसून येते. वर्णनपद्धती अतुलनीय. कविता करण्याला किती काय काय गुण लागतात व किती कठीण काम आहे याचा प्रत्यय वाचकांना येतो.
बाकीच्याही कविता लक्षणीय!
(हजरी) - देवपूजा-फोटो-देव हजर म्हणत नाहीत. त्यामुळे छगनला आलेली चीड. यातून बालमन या गोष्टींनी कसे अस्वस्थ होते. योग्य ते ज्ञान त्याला न मिळाल्यामुळे अस्वस्थ होऊन तो कदाचित या सर्व गोष्टींचा छडा लावण्याचा प्रयत्न करेल किंवा यात काहीच अर्थ नाही या निषेधापर्यंत जाईल. मुलांची मानसिकता लक्षात घेऊन शिकविण्याची परिपक्वता शिक्षकाने दाखवावी असे मला वाटते. नाहीतर मुले न समजणाऱ्या गोष्टींचा निषेध व त्याग करतात.
(यज्ञ) - खूप धनाचा अपव्यय, केळवन खुडले गेलेले, खूप तूप स्वाहा झालेले, फळझाडे-फुलझाडे उघडे बोडखे, पंगतीवर झालेला खर्च 'प्रकृतिरक्षकयज्ञसमाप्ती' शीर्षक पाहून कवीला खरे समाधान कारण आता खरे पृथ्वीवरचे संकट टळले. त्याचा समाधानाचा निःश्वास आपल्यापर्यंत पोहोचतो. यज्ञ, देवदेवता, पूजा हे सर्व रूढी-परंपरागत चालत आलेले फारसे व्यवहार्य कवीला वाटत नाही. व आपल्यालाही. यात सुधारणा अभिप्रेत.
(न) -आस्तिक नास्तिकमधला फरक.
(शाळा) - पब्लिकमधला नास्तिक माणूस घरी आस्तिक असतो.
(शून्य) - चाली, रीती, संस्कृतीचा पिटता पिटता ढोल । चाला किंवा थांबा, प्रगती शून्य, तेही गोल ।। ओळी लक्षणीय.
(आजी) - हात चालवता चालवता अखंड काम करत होती. पूजेच्या, जपाच्या नावाने कधी रिकामी बसली नाही.
(चोरदरवाजा) - मर्तिकांचेही कसे पैसे खातात. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे.
(पंचपाळे) - पाच बोटांचे वैयक्तिक महत्त्व व धिक्कारिती आवळूनी मूठ । नियती, कुंडली सारे झूट ।।
(मंगळ) - मुलीला मंगळ असणे म्हणजे लग्न जमण्यात बाधा- या समजुतीवर केलेली टीकास्वरूप कविता. भ्रामक सजमुतींवरचा विश्वास अर्थातच कवीला अमान्य.
(साडेसाती) - नेमके विपरीत घडत जाते या समजावरची कविता.
(जोकर) - विनोदी कविता. अक्षतांचे पोतेच स्वर्गात गेलेल्या माणसाला! खूप अक्षता त्याने जन्मभर वाहिलेल्या, म्हणून झालेल्या पुण्याची जोड! - कविता प्रत्यक्ष वाचावी. हसताना मुरकुंडी वळते.
(तुळशीचे लग्न) - मार्गशीर्षी वद्य नवमी । या नारदाच्या मुंजीला ।। कवीला नारद ही प्रतिमा फार प्रिय. नारायण-नारायण म्हणणारा नारद कृष्णभक्त, विष्णुभक्त. तोच कृष्ण-तुळशीच्या लग्नानंतर जन्माला येणार ही कल्पना सुंदर.
(अक्षय) - 'अक्षय्यतृतीयेला सोने घेणे शुभ' या कल्पनेवरचा आघात - वर्णन बेहद्द सुरेख.
(अर्ज) - दानपेटीत अनेकांचे देवाजवळच्या मागण्यांचे अर्ज- वर्णन बहारदार. सगळ्यांच्या डोक्यावरती झाडफळ पडो, न्यूटन-वैज्ञानिक. गुरुत्वाकर्षणाचा शोध.
'विज्ञानातच तू आहे, डोकी प्रकाश पडो ।
तू कोणाला पावत नाही, साक्षात्कार घडो ।।प्रयत्न, कर्मावरील विश्वास.
'असा चमत्कार तुझ्या आशिवदि घडो ।
स्वप्नात सुद्धा पडले नाही असे स्वप्न पडो । कधी कोणी केले नाही असे कार्य घडो ।
कधी कुठे घडले नाही असे काही घडो ।
सावली ज्याने पडणार नाही असा प्रकाश पडो । - दुर्दम्य आशावाद व इच्छा.
(आनंदी-आनंद) - आनंदी श्रमाचे महत्त्व सांगते, आनंदा सांगतो यशप्राप्तीचा मंत्र 'ॐ नमः शिवाय'. डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगून विज्ञानाचे धडे शिकविते आनंदी, देवळात आनंदा जन्ममृत्यु, ८४ लक्ष योनींचा भक्तजनांना धाक दाखवितो. आनंदी सूर्य, चंद्र, तारे, ग्रहण याविषयीची ज्ञानपिपासा भागविते. देवळात आनंदा दैवीकोप अरिष्ट आणते असे सांगतो. देवळात खूप गर्दी - आनंदी एकटी म्हणजे आनंदाचे म्हणणे लोकांना पटते. 'आकाशीच्या चेंडूचीही हीच कथा असते । एकच बाजू त्याची नेहमी पृथ्वीला दिसते ।'. थोडक्यात सार सांगण्याची कवीची हातोटी.
(खोखो) - योग्य उपचार करून घ््यावेत. उगाच मनानेच उपाय करून रोग लांबवू नये यावरील कविता. डॉक्टरी ज्ञानाचा उपयोग यावर भर कवीचा.
(कीर्तन) - कीर्तन संपल्यानंतर आरतीच्या तबकात काय पडते यावर पुजाऱ्याचे लक्ष, यावरील मार्मिक टीका.
(संस्कार) - नवरात्रात घटाच्या समईत रात्रंदिन तेल असले तरच दीप उजळेल व देवी प्रसन्न होईल म्हणून त्याकडे बारीक लक्ष, पण समईला स्लीपमोड मध्ये ठेवून छगनने तेल वाचविले. छगनचा गणिताचा पेपर चांगला गेला. पण आजीला उत्तर देताना तो म्हणतो 'काही येत नव्हते, अक्षदा चिकटवल्या'. चुकून आषाढी एकादशीला छगनने समोसा खाल्ला. आजीच्या चिडीला काँप्युटरवर undo ची त्याने कमाल दाखविली. दही साखर हातावर घेऊन बाहेर पडले की काम फत्ते अशी समजुत व मांजर आडवे गेल्यामुळे प्रमोशन झाले नाही. कामात विघ््न. वेगाने स्कूटर चालवत असताना मारुतीला हात जोडले - मरण. गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन- खोटा आळ येऊ नये म्हणून तबकातले पैसे चोरले. समोर वाघ छगनच्या- त्याने भीमरूपी महारूद्रा म्हटले. वाघाने 'वदनी कवळ घेता' म्हटले (विनोदी अभिव्यक्ती सुरेख).
समजुतीवरील मार्मिक टीका.
रीती, संस्कृती, अंधश्रद्धा यांचे खूप पेव माजले । डोके गहाण ठेवून राहू (की केतू?) वाघाचे शिकार झाले ।
कवीची लेखणी हे समजविण्यासाठी झिजली आहे. पडला का टाळक्यात प्रकाश?
जग सतत बदलत असते. आजचा दिवस कालच्यासारखा नसतो. आला दिवस सारखा नसतो. रूढी, परंपरा, प्रघात यांच्यावर घणाघाती आघात नेहमीच होत आले आहेत. त्यामुळे सुधारणाही होतात व विचारांना दिशाही मिळते. न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर यांनी राजकीय-सामाजिक सुधारणा घडवून आणल्या.
जुने जाऊ द्या मरणालागुनी । जाळुनि किंवा पुरूनी टाका ।
सडत न एक्या ठायी ठाका । सावध ऐका पुढच्या हाका ।।
खांद्यास चला खांदा भिडवूनी ।
एक तुतारी द्या मजलागुनी ।
फुंकीन मी जी स्वप्राणाने ।
भेदुनि टाकीन सगळी गगने ।
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने ।
अशी तुतारी द्या मजलागुनी ।
असे केशवसुत म्हणून गेले.
भौतिकतेचा पेपर तसा सोपा असतो. अभ्यास खूप करावा लागतो, जिद्दही व प्रयत्नही चिकाटीचे असावे लागतात. पण वस्तू दिसत असतात. आध्यात्मिक पेपर खूपच कठीण. दृष्टीला काहीच दिसत नाही. सर्व निर्गुण
निराकार! तरीही त्या 'पूर्णस्य, पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते'चा शोध मानव घेतोच. 'दशांगुळी उरणारा' शोधण्यासाठी अनेक जन्मानुजन्म घ््यावे लागले तरी तो तपस्या करतोच. विज्ञान आणि अध्यात्म तसे
परस्परविरोधी नाहीच. दोन्हीही मार्ग प्रभावी व एकमेकांना पूरक आहेत. ज्या ज्या सणावारांना जे जे पदार्थ केले जातात ते ऋतूनुसार आरोग्यदायी असतात, असे आहारशास्त्रज्ञ सांगतात. देवीच्या नवरात्रात घटाच्या स्थापनेने धनधान्याची - सगळ्या नवनिर्मितीची पूजा केली जाते. दुष्टांचा विनाश व उदे गं अंबाबाई च्या घोषाने, ऊद, राळ यांच्या सुवासाने वातावरण चैतन्यमय होते. प्रत्येक सणाचा व त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या सर्व संसाधनांचा अभ्यास केला तर मनातील अनेक विकल्प निघून जातात. पूर्वीची स्त्री अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने हे करीत असे. जेवणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिचे पोट भरत असे. हा आनंद आज मिळणे दुर्मिळ झाले आहे. एकतर पुरणपोळी येत नाही (हे एक उदाहरण घेतले). दुसरे काही करायचेही नाही. त्यात काय? बाहेरून आणू, बाहेर खाऊ. ही वृत्ती नाकर्ती. यामुळे कुटुंबव्यवस्थेची हानीही फार झाली आहे. श्रद्धाभावनेने परमेश्वराची पूजा केल्यानंतर मिळणारी शांती समाजातून दूर गेली आहे. आनुषंगिक पुष्कळ दुष्परिणामही, विघातक कृत्येही समाजात दिसतात. ही बाजू डावलून चालणार नाही.
सर्व व्यवस्थितपणे करणारी गृहिणी, तिची हेटाळणी न होता, तिचे अपरंपार कौतुक व्हायला हवे. आपल्या आईला, बायकोला हे काही करावयाचेच नाही व करताही येत नाही हे आवडण्याजोगे आहे काय? तशीही कुटंबव्यवस्था मोडलेलीच आहे. कोणालाच कोणाचे काहीच करावयाचे नाही ही नकारात्मक वृत्ती सोडून देऊन सर्वांनी एकजुटीने कार्य केले तर त्यात समाजकल्याणच आहे.
सारे जीवन- सारे साहित्यविश्व विश्वास-अविश्वासाच्या हिंदोळ्यावर गरागर झोके घेत आहे. शेक्सपियरची नाटके- ऑथेल्लो, हॅम्लेट, ज्युलियस सीझर वाचणाऱ्यांना कितीतरी उदाहरणांची मेजवानी मिळेल. डेस्डिमोना जवळील एका रूमालाने संशयपिशाच्च निर्माण केले व शूरवीर असलेला ऑथेल्लो ढासळला. To be or not to be असे द्वंद्व हॅम्लेटच्या मनात निर्माण झाले कारण काकाने विश्वासघाताने वडिलांच्या कानात विष ओतून खून केला व आईने काकांशी लग्न केले. कसा ठेवायचा विश्वास आयुष्यावर? ज्युलियस सीझरला 'You too Brutus?' असे आश्चर्याने म्हणावे लागले.
'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्' असे म्हणतात. महाभारतात व्यासप्रतिभेने ज्या व्यक्तिरेखा रेखाटल्या, त्यातले मानवी स्वभावाचे दर्शन, त्याव्यतिरिक्त व्यक्तिदर्शनाच्या छटा इतरत्र आढळूच शकत नाही हा विश्वास मात्र कायम आहे.
रावणाच्या अशोकवनात सीता राहिली. त्याने तिला पळवून नेले होते. ती शुद्ध कशी? या धोब्याच्या अविश्वासाने सारे रामायणच बदलून गेले.
येशू ख्रिस्ताला सूळावर लटकविले. तो सूळ त्याला स्वतःच ओढत न्यावा लागला. खिळे ठोकून येशूला संपविले. कशावर विश्वास ठेवायचा? तो येशू पुन्हा प्रकट झाला यावर की माणसाच्या क्रूरातिक्रूर वागण्यावर? गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली. तरी नंतर ते लोकांना दिसले- काय खरे? डोके चक्रावणाऱ्या अशा अनेकानेक घटनांनी विश्वास-अविश्वासाच्या तराजूचे पारडे हेलकावत राहते.
सर्व गोष्टींवरील विश्वास उडेल अशा घटना समाजात घडत आहेत. भ्रष्टाचार, स्त्रीची असुरक्षितता, पैशाचे अवास्तव आकर्षण, कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नाही अशा परिस्थितीतही दीपस्तंभाप्रमाणे कायम मानवाला निरामय शांतीचा विश्वास देणारे महापुरूष निर्माण होतच असतात.
विश्वामित्राने हरिश्चंद्राची कठोरातिकठोर परीक्षा घेतली. मांगाच्या घरी त्याला पाणी भरायला लावले. स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने राज्यत्याग केला. तारामती (बायको) व रोहिदास (मुलगा) यांच्यासकट. पाणी ज्या घड्यात भरावयाचे त्याला बारीक छिद्र पाडले. घडा भरणार कसा? सर्व सत्त्वपरीक्षेत सरशी होणाऱ्या महापुरुषांची कमी नाही. शिबीराजा-श्रियाळ-चांगुणेचे कथानक - मुलांनी जाणून घ््याव्या अशा अनेकानेक गोष्टींनी इतिहास घडला आहे. बालवेद आहे ना? मग जाणून घ््यायला नको? झाडावरची कणसे खाऊन त्यावरच पोटभराई करून युद्धाला सामोरे जाणारे पहिले बाजीराव पेशवे - सुवर्णकाळाचा अस्त, तोतयाचे बंड होऊन, रसातळास सर्व काही गेले.
व्यापारी वेश पांघरून, एकेक राज्य खालसा करत, सर्व गिळंकृत करणारे इंग्रज- कसा आहे आपला इतिहास? सर्वांनी आपल्याला गिळंकृत करण्याचे प्रयत्न केले.
अविश्वासाचे याहून मोठे उदाहरण कोणते? पण हिरोशिमा व नागासाकी दोन्ही शहरे उध्वस्त झाल्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून पुन्हा सर्व पुनःप्रस्थापित करणारा जपान हा माणसाच्या विश्वासाचा एक मोठा आधार आहे. अविश्वासाने कोलमडलेले मन कुठेतरी चैतन्यदायी प्रेरणेने पुन्हा विश्वासाला सामोरे जाते. १५ ऑक्टोबर अब्दुल कलामांचा जन्मदिवस (माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन) वाचन प्रेरणा दिवस म्हणून सरकारतर्फे जाहीर झाला. 'विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा' हे पुस्तक मराठीत सृजनपाल सिंग यांनी लिहीले. विद्यार्थ्यांना खूप आवडले. अशा घटना मनाला खूप उल्हसित करतात.
फक्त विज्ञानाच्याच नाही, सर्वच क्षेत्रात, सर्वांनी खूप प्रयत्न करून, यश मिळवून जगाला संपन्न करावे.
'हे विश्वचि माझे घर' - ज्ञानेश्वर
सर्वेऽपि सुखिनः सन्तु ।
सर्वे सन्तु निरामयः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।
असे तर वेदमंत्रांनी म्हणूनच ठेवले आहे.
विश्वासाचा घडा, की त्याला गेलेला तडा?
पालथ्या घड्यावर पाणी तर नाही?
संगीता मुकुंदराव पाटखेडकर
१५-१०-२०१५
-----------
कोणता मानू चंद्रमा!
अग्नीच्या शोधापासून, चाकाच्या शोधापासून तर आत्ताआत्ताच्या मंगळावर लागलेल्या पाण्याचा शोधापर्यंत आणि मानवी क्लोन तयार करण्याच्या शोधापर्यंत सर्व विस्मयकारीच आहे. ही मानवाने बुध्दीच्या जोरावर केलेली प्रगती हा कवितेचा विषय होऊ शकतो का? अशी कोणी कल्पनाही केली नसेल! आजवर अनेकांनी विज्ञानकविता केल्या, विज्ञान रांगोळ्या पण काढल्या पण 'मानवचंद्र' या कवितेचा आवाकाच इतका मोठ्ठा, भव्यदिव्य आहे की कविप्रतिभेचा चंद्रही त्या दिवशी आपल्या सर्व कलांनी प्रकटला होता असे मला वाटले.
'उद्या लग्न आहे', 'बालवेद' आणि 'जन्मशताब्दी - स्मरणिका' ही कवींची तीन अपत्ये आत्तापर्यंत रसिकांसमोर आली आहेत. त्यात डावे-उजवे करण्याचा प्रश्नच नाही. पण 'मानवचंद्र' ही दीर्घकविता म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असलेल्या कविमनाचा प्रफुल्लित आविष्कार वाटतो. विषय इतका कठीण असतानाही कवीने तो कोठेही क्लिष्ट, बोजड होऊ दिला नाही. संपूर्ण रचना प्रभावी आहे, त्यामुळे ती एका दमात वाचता येते.
कवीच्या स्वभावानुसार, विषयाच्या गरजेनुसार 'मानवचंद्र' ही एक दीर्घ कविता आहे. हे एक युनिट आहे, तसेच ही कविता 'युनिक'ही आहे. म्हणजे ही कविता पूर्ण एका दमात वाचल्याशिवाय आपल्या मनात आशयवर्तुळ पूर्ण होणार नाही आणि या एकमेवाद्वितीय अशा कवितेचा रसास्वादही आपल्याला घेता येणार नाही.
आता तुम्ही म्हणाल, विज्ञान कवितेचा रसास्वाद तो कसा घेणार? रसनिष्पत्ती ही रसिकाच्या मनात होत असते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया पासून तर पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने विज्ञान-आविष्कारांचा अत्यंत ओघवती, धावता आढावा कवी घेतो. मन थक्क होते. याला अद्भुतरस नाही म्हणणार तर काय?
तदनंतर अमावस्येपर्यंत विज्ञानाच्या आधारावर माणसातील सैतानी वृत्तीने घातलेला नरसंहार, धिंगाणा पाहिला की मनात भय निर्माण होते - हाच भयानकरस!
पण कवी आशावादी आहे. मानवाच्या सामर्थ्यावर, बुध्दीवर, मानवतेवर त्याचा अढळ विश्वास आहे. धृव आणि माणूस हे दोन अढळ आहेत असे तो मानतो -
'या जगताचा केंद्रबिंदू तू'
'गॅलिलिओ तू मानवपुत्रा, ज्ञानधृवी धन्य'
'जोड हवी दृष्टीस बुध्दीची हेचि ब्रह्मवाक्य'
या आणि अशा कित्येक काव्यपंक्ती याचीच साक्ष देतात. कवितेचा समारोप म्हणजे तर या कवितेचा सर्वोच्च बिंदू आहे, मध्यवर्ती कल्पनाच आहे -
"वेळोवेळी संकेतांना जुमानले ना मुला
ताणून ताणून वस्त्र फाडले, ठिगळ लावू दे मला
गतयुगातल्या गतचुका अता प्रलयी दे जाऊ
सुशील उदरी, सदाशिवगृही पुन्हा जन्म घेऊ"
रसीकांच्या मनात शांत रसाची निर्मिती करणे, हेच कवीचे आणि कवितेचे उद्दीष्ट असायला पाहिजे. जसे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "इथे शांताचेया घरा, अद्भुत पाहुणेरा".
११ व्या अध्यायात विश्वरूप दर्शन आहे. तेथे अद्भुतरसाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी फारच सुरेख केली. पण ते त्यांचे उद्दीष्ट नव्हते -
'अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन'
ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि विश्वात्मक देवाला त्यांनी मागितले मानवासाठी पसायदान. हाच तो शांतरस!
आमची आई लाडाने अरुणला 'अरुणचंद्रा' म्हणायची. हाच आईचा लाडका अरुणचंद्रा मोहरीरांच्या घराण्यातील ज्ञानेश्वर आहे.
सामान्य मराठी माणसाला संस्कृतात बंदिस्त असलेले तत्वज्ञान कळावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी रूपक आणि दृष्टांत या दोन सोप्या अलंकाराचा सहजसुंदर वापर केला. 'मानवचंद्रा'च्या कवींचे उद्दीष्ट तेच होते आणि त्यासाठी त्यांनी वापर केला तो उपमा आणि उत्प्रेक्षा या दोन अलंकारांचा. उपमेची उदाहरणे तुम्हाला सहजच ओळखू येतील. म्हणून ती विस्तारभयास्तव मी देत नाही. पण वानगीदाखल काही उत्प्रेक्षेची उदाहरणे देते -
१) पुढे पुढे तू जात राहिला, जणू काळ वा नदी
२) अग्निपंख फुटताच जणू तू घेतली भरारी
३) विचार, भाषाज्ञान जणू हो कळस देऊळीचा
४) पाच गावची माती, जणू बोटे हाताची असे
५) जणू कुणी अदृश्य शक्तीने तुला चीत केले।
सृष्टीने तव कानामध्ये गूढ कुजबुजले॥
६) लोहचुंबकाने तर मोठी क्रांती केली रे ।
आकाशीचा धृव आता जणू मुठीत आला रे ।।
विज्ञानाच्या एकेका शोधाचा - उदा. अग्नी, वीज, भाषा, शेतकी विज्ञान, लोहचुंबक - उल्लेख एकेका उत्प्रेक्षेने करणे हे वाटते तितके सोपे नाही. विज्ञानाच्या ज्ञानावर आणि भाषेवर - दोन्हींवर कवींचे सारखेच प्रभुत्व आहे.
या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कवितेला सुभाषितमूल्य आहे. आज आम्ही तुकारामांचा एखादा अभंग सहज सुभाषित म्हणून वापरून जातो - उदाहरणार्थ 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा'. तसेच या कवितेतील अनेक काव्यपंक्तींचा उद्या सुभाषितासारखा वापर येणाऱ्या पिढ्या करतील हे नक्की! उदाहरणार्थ;
१) निर्माणाला युगे लागती, संहाराला क्षण
२) आवाजांना अर्थ दिला तू, शब्दांना शक्ती
भाषेला तू जन्म दिला रे, तू केली क्रांती
३) भाषेचे तू शस्त्र मिळविले, विचार तू करतो
४) नवनव उच्चारांची शेती तूच करी फक्त
५) अगम्य सृष्टीचा तू आता विद्यार्थी झाला
६) सृष्टिरहस्याच्या खजिन्यातील एक एक नाणे
भरती आणी ज्ञानसमुद्रा, गा न्यूटनगाणे
७) भविष्य अपुले स्वतः घडविले स्वकृतीने बाळा
तुला अता रे कोण थांबवी, या विज्ञानांगणी
८) कुंभाराचे चाक असो वा विहिरीवरचे रहाट
या चक्राने क्रांती केली, आली नवी पहाट
९) ज्ञानकन्हैयाची तू राधा, म्हणुनी थोर झाला
१०) खनिजांचा खजिनाचा खजिना लुटू नको रे मुला
बुध्दिदान हे अभयदान तू मानू नको रे मुला
या कवितेचे स्तिमित करणारे काव्यवैशिष्ट्य म्हणजे कवीची अफाट कल्पनाशक्ती. खालील उदाहरणेच पुरेशी बोलकी आहेत -
१) परमाणुशक्तीच्या शोधावरचे कवींचे भाष्य बघा;
पर्यावरणा ईजा करीतसे प्रगतीची रे गती
परमाणू उर्जा देई तुज धूररहित शक्ती
दिव्य शक्ती ही जैसी तारक, संहारकही असे
शाप आणि वरदान असे ही, जन्म मृत्यू ही असे
२) रसायनांच्या शोधावरचा कवींचा इशारा बघा;
सव्यापसव्य ठरवी जी सदसद्विवेक बुध्दी
ती सरता रे व्यर्थ तुझी ही जाण ज्ञानसिध्दी
३) विमानाच्या शोधावरची कवींची गरूडझेप बघा -
पक्षांचा तुज हेवा वाटे, तुला कां न पंख
सर्व साध्य, पण उडता ये ना, असह्य हा डंख
एके दिवशी नभात घेईन उंच उंच झेप
तुझी अस्मिता जणू फुंकते पांञ्चजन्य शंख
४) खगोलशास्त्रातील भरारी कवी अनन्वयाने वर्णितो -
चंद्र रोजचा आकाशी तुज देई आव्हान
खगोलात उडणारा पक्षी तूच, नसे अन्य!
५) मानव चंद्रावर गेला, काय वाटले कवीला -
चंद्रावरुनी मागे बघता अपूर्व नवलाई
डोळ्यामध्ये तुझ्या न मावे, तुझीच रे आई
आईला ह्या दृष्ट मुलाची नको लागू देऊ
दृष्ट काढण्या गालबोट रे नको तिला लावू
मानवाने केलेल्या प्रगतीचा कवीला जितका अभिमान आहे तितकेच त्याचे भूमातेवरही प्रेम आहे. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी जायला नको, हाच या एकूण कवितेचा गर्भितार्थ आहे.
तात्पर्य काय की 'मानवचंद्र ही एकच कविता रसग्रहणाचा विषय म्हणूनही अफाटच आहे आणि अरुणचंद्र मोहरीरांचे व्यक्तित्व आणि काव्य हा तर Ph.D. चाच विषय होऊ शकतो. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला बाळशास्त्री हरदासांवर Ph.D. करायचे आहे, असे मी प्रा. राम शेवाळकरांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले 'तुला बाळशास्त्रींचा अभ्यास करावयाचा आहे की Ph.D. मिळवायची आहे?'. मी चकितच झाले. Ph.D. मिळवायची असेल तर सोपा विषय निवड, ही त्यांची त्यावरील टिप्पणी होती. मोहरीरांच्या साहित्यावर Ph.D. करु धजावणारा तितकाच सक्षम असावा लागेल, हे मात्र निश्चित!
'मानवचंद्र' ही कविता पूर्वार्धात विज्ञानकविता वाटते, पण उत्तरार्धात ही दीर्घ कविता एकदम आगळीच उंची गाठते, आणि समारोपाच्या काही कडव्यांमध्ये तर ती आध्यात्मिक कविताच ठरते. आणि तसे पाहिले तर विज्ञान आणि आमचे भारतीय अध्यात्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैज्ञानिक डॉ. अरुण मोहरीर आणि पंडितकवी अरुण मोहरीर ह्या दोन वेगळ्या व्यक्ती नाहीतच. आणि त्याहीपुढे जाऊन मी असे म्हणेन की अरुणचंद्र आणि मानवचंद्र ह्या दोन वेगळ्या गोष्टी मानायची काही गरज नाही. मी माझा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करते - कवी म्हणतात;
'निसर्गकोपाचे हे पाणी ओसरेल कधीतरी
पुन्हा जमीनीवरती अंकुर, वृक्षराई गोजिरी
गतयुगातल्या गतचुका अता प्रलयी दे जाऊ
सुशील उदरी सदाशिवगृही पुन्हा जन्म घेऊ'
प्रलयानंतर कोण जन्म घेणार आहे? एकटा अरुण की मानव? अहो, हा सुरेख, सहजसुंदर साधलेला अर्थश्लेष आहे.
आम्ही असे ऐकले होते - प्रलयाच्या वेळी पंचमहाभूते एकमेकात विलीन होऊन जातील. सर्वत्र फक्त पाणीच पाणी होईल आणि कालांतराने एका पिंपळाच्या पानावर एक बालक पायाचा आंगठा चोखत दिसणार आहे. यालाच 'दशांगुळे उरला' असे म्हणतात. आणि कवी काय म्हणतात बघा -
बुडबुड बुडबुड येती बुडबुडे, अता तेही शांत
शांत किती ही निरव शांतता, हाच तो युगान्त
बिंब मिळतसे प्रतिबिंबाला, ही निसर्गइच्छा
नव्या युगाच्या नव्या पहाटे, करू या सदिच्छा
कवी स्वतःच या कवितेच्या प्रास्ताविकात म्हणतात - 'स्वतःच्या मनाशीच, स्वतःच्याच प्रतिबिंबाशी अलिप्ततेने संवाद करण्याची कल्पना या कवितेत introspection (आत्मनिरीक्षण) साठी वापरली'. या कवितेत एक कडवे, एक विचार झाला की पालुपदासारखे येते. त्यातूनही हीच गोष्ट अधिकच स्पष्ट होते.
आठवता हे रिंगण त्याच्या ज्ञानदिंडीमधले
बिंब मनी हर्षले, धरूनी वृक्षा दृढ बैसले
बिंब आणि प्रतिबिंबामधले अंतर थोडे कमी
महापूर हा, प्रलय असे वा युगान्त सांगा तुम्ही
हे बिंब आणि प्रतिबिंब म्हणजेच कवी आणि मानवचंद्र आहे.
दुसराही एक अर्थ आहे. पहिल्याच कडव्यात म्हटले आहे की;
महापूर येता कसाबसा जीव वाचवूनी
द्विपाद प्राणी कष्टी होउनी झाडावर गेला
जलाशयातील उलट्या वृक्षाच्या फांदीवरती
आनंदाने डोळे मिचकावित वानर बैसला
पुराचे पाणी सर्वत्र पसरले आहे. मानव वृक्षाच्या टोकावर कसाबसा जीव मुठीत धरून बसलेला आहे. पाण्यामधे वृक्षाचे व मानवाचे प्रतिबिंब पडले आहे. पण प्रतिबिंब मात्र मानवाच्या मूळ स्वरूपात, वानररूपात आहे. त्या स्वतःच्या प्रतिबिंबाशी, आपल्याच आदिरूपाशी, आपल्याच भूतकाळाशी हा मानवाचा संकटकाळी होणारा संवाद. बिंब आणि प्रतिबिंबातील अंतर कमी कमी होते म्हणजेच पाण्याची पातळी सतत वाढतेच आहे. संकट अधिकच रौद्ररूप धारण करीत आहे. आणि म्हणून 'महापूर हा, प्रलय असे की युगांत सांगा तुम्ही' असे शब्द वारंवार पालुपदात येतात. रक्त गोठवणारे हे पालुपद आहे.
पालुपदातल्या पहिल्या दोन ओळीही महत्त्वाच्या आहेत. आपले दैिदप्यमान यश आठवून मानव कठिण प्रसंगीही आनंदतो. तसेच आपण ह्या कठिण प्रसंगावरही मात करू अशी आशाही त्याला वाटते. पण पाणी मात्र सतत चढतच जाते आणि आशा कमी कमी.
कवींनी मानवचंद्राचे केलेले वर्णन खुद्द कवीलाच तंतोतंत लागू पडते - बघा
i) बुध्दी, युक्ती, चिकाटी तुझी धन्य, धन्य, धन्य!
ii) अफाट प्रतिभा, कष्ट त्यावरी, तू ज्ञानी झाला
अरुणचंद्र हाच मानवचंद्र तर नाही ना, असा संभ्रम मनात निर्माण होतो; म्हणूनच म्हणावेसे वाटते - 'कोणता मानू चंद्रमा!'
आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुतांच्या 'आम्ही कोण' या एकाच कवितेवर ग्रंथ लिहिण्यात आले. केशवसुत म्हणतात -
"आम्ही कोण म्हणून काय पुससी; आम्ही असू लाडके, देवाचे"
मानवचंद्रचे कवी काय म्हणतात -
'तू सृष्टीचा लेक लाडका, तुझ्यावरी लोभ
बुध्दिदान तुज, खजिनाही तुज, आवर रे लोभ'
काय फरक आहे केशवसुत आणि प्रस्तुत कवी यांच्यात? तद्दन फरक काहीही नाही. खंडाळ्याच्या बंगल्यात जाऊन 'क-हेचे पाणी' हे आत्मचरित्र लिहिणारे प्र. के. अत्रे, तुरूंगातून आपल्या लाडक्या लेकीस 'इंदिरेस पत्रे' लिहिणारे पं. जवाहरलाल नेहरू, मंडालेच्या तुरूंगातून 'गीतारहस्य' सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आपल्या बेडवरून मानवचंद्राशी आत्मसंवाद साधणारे अरुणचंद्र यात मूल्यात्मक दृष्ट्या काही फरक आहे, असे मला तरी वाटत नाही. या सर्व महान विचारवंतांनी आत्ममग्न अवस्थेत निर्माण केलेल्या या अमर कलाकृती आहेत.
मानवचंद्राच्या पूर्वार्धात अद्भुतरस आणि भयानकरस आहेत असे मी म्हटले. यातील सीमारेषा फारच पुसट असतात. तसेच कवितेच्या समारोपाकडे वळताना कवी वत्सलरस, करूणरस आणि अंतिमतः शांतरसाचीही निर्मिती अत्यंत प्रगल्भतेने करतात. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मा. गो. देशमुख आपल्या 'मराठीचे साहित्यशास्त्र' या ग्रंथात म्हणतात; सर्व मराठी संतकवींनी 'वत्सलरसा'ची निर्मिती इतकी भरपूर प्रमाणात केली आहे की मराठीत 'वत्सलरस' हा १० वा रस मानायला पाहिजे. विज्ञानातील शोधांच्या आधारावरच काही वाट चुकलेल्या माणसांनीच भयानक नरसंहार घडवून आणला. कवी नागासाकीचे उदाहरण देतात. ओझोन लेअर फाटले, सूर्याची उष्णता पृथ्वीवर काय हाहाःकार उडवते आहे, याचाही उल्लेख कवी करतात. पण ह्या सर्वांमुळे कवी वैतागत नाही. त्यांना शिव्याशाप देत नाहीत. उलट म्हणतात -
'अग्नी जैसे शस्त्र दुधारी, बुद्ध्यास्त्रही बाळा
अयोग्य वापर विनाश आणी, काळ असे काळा'
'वेळोवेळी संकेतांना जुमानले ना मुला
ताणून ताणून वस्त्र फाटले, ठिगळ लावू दे मला'
आई आपल्या बंड, खोडकर मुलांना रागवत नाही, मारत नाही, शिक्षा करत नाही, अबोला धरत नाही; तर त्यांना समजावून सांगते, धोक्यापासून सावध करते. कवीच्या मनातील 'वत्सलरस'च बाळा, मुला या संबोधनांमधून व्यक्त होतो.
'जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ॥' असे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांना भागवतधर्मीय, वारकरी पंथातले लोक 'माऊली'च म्हणतात. काय फरक आहे? तसेच काहीसे येथेही आहे.
साईच्या दूधाला विरजण लावावे, ते घुसळून घुसळून त्यावर घट्ट लोण्याचा गोळा यावा तसे पौर्णिमेचे सहा कडवे आहेत. जणू काय या संपूर्ण कवितेचे नवनीत! वानगीदाखल बघा -
युगे पूर्वीही अनंत आली, नसे दुजे अन्य
मानवयुग हे, स्पष्ट ज्यावरी तुझेच पदचिन्ह
कलेकलेने ज्ञान वाढता चंद्र पौर्णिमेचा
दिसतो मज तू झाडावरती, भास असा हा कसा
काय सुरेख अपन्हुती अलंकार!
अंधश्रध्देवरही कवींनी वारंवार प्रहार केले आहेत. आज आपल्या सभोवार काय घडत आहे, हे लक्षात घेता कवीचे सामाजिक भानही किती जागरूक आणि जागृत आहे, हे आपल्या लक्षात येईल. अंधश्रध्देच्या आहारी जाणा-या, आणि बुवाबाजीला फसणा-या समाजाला कवी सावध करतात बघा -
ज्ञान दडवुनी अज्ञानाचा प्रसार तू करिशी
दरबारी रे तुझ्या वाटशी कृपा, जनां फसविशी
पाप-पुण्य कल्पना सांगुनी, यज्ञमार्ग दाविशी
जोपासुनी तू अंधश्रद्धा, यज्ञा बाटविशी
बीभत्स रस हा तसा अस्पर्शितच रस. रामदासस्वामींनीही मानवी देहाचे - त्याच्या घाणेरडेपणाचे बीभत्स वर्णन केले. हेतू - माणसाने देहाच्या आसक्तीतून मुक्त व्हावे. कलिंगदेशाच्या युध्दात प्रचंड जीवहानी झालेली पाहून सम्राट अशोकाने एकदम अहिंसामार्ग स्वीकारला. शस्त्र अस्त्र यांचा मानवतेच्या -हासासाठी वापर करणाऱ्यांच्या कृत्याचे कवीनी बीभत्स रसात केलेले वर्णन बघा -
यंत्रे आता अस्त्रे झाली, गाडे रणगाडे
गोफण शेतातील फेकते स्फोटक चहूकडे
शिरच्छेद करणारी यंत्रे, प्राणशोष वायू
शौर्य त्यागुनी, क्रौर्य दाविती तुझे रक्त, स्नायू
दुस-या महायुद्धात हिटलरने काय केले, आज सिरियात काय घडत आहे, ह्याचेच हे ह्रदयविदारक चित्रण आहे.
इंग्लिश साहित्यात करुणरस सर्वश्रेष्ठ मानला जातो. शेक्सपिअरची सर्व नाटके Tragedy आहेत. मानवाच्याच चुकीमुळे सृष्टीचा -हास होत चालला आहे आणि सर्वनाश अटळ आहे, कलियुगाची अखेर जवळ आली आहे, हे वर्णन करताना कवी म्हणतात -
वेळोवेळी संकेतांना जुमानले ना मुला
ताणून, ताणून वस्त्र फाडले, ठिगळ लावू दे मला
भाविक यमुनाजल हे नाही, पदस्पर्शे ओसरे
सृष्टीकोप हे काळे पाणी, तव स्पर्शा आतुरे
प्रलयाची, सृष्टीच्या अंताची चाहूल कवी सूचित करून देतो यातच सारे आले. कवीला येथे बीभत्सरसाची निर्मिती करता आली असती, भयानकरसाची निर्मिती करता आली असती, पण कवीचे ते उद्दीष्टच नव्हते. संदर्भप्रचुरता हे कवीचे वैशिष्टय़ही या निमित्ताने आपल्या लक्षात आले असेलच. बाळकृष्णाच्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून यमुनेचे पाणी वरवर चढत होते. यमुनेला कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन व्हावयाचे होते, आणि वासुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून कृष्णाने टोपलीच्या बाहेर पाय काढला, नदी शांत झाली, आणि वासुदेव बाळकृष्णाला घेऊन नदीपार झाले. येथे उलट आहे. हे काळेपाणी आहे. पुन्हा अर्थ श्लेष. काळनदीचे पाणी इतके वरवर चढू लागले आहे की बिंब-प्रतिबिंब एकमेकात विलीन होऊन जातील, सर्वत्र पाणीच पाणी होईल - हाच तो प्रलय! अतिशय मार्मिकतेने, संयतपणे करुणरसाचा परमोत्कट आविष्कार कवीने येथे साधला आहे.
एरवी विस्ताराकडे, दीर्घाकडे कल असणारी कवीची लेखणी अजून एका विषयात अत्यंत संयत रुप धारण करते. आजचा सर्वात ज्वलंत आणि जीवाला भिडणारा विषय असेल तर तो स्त्रीभ्रृणहत्येचा. आपल्या सोयीसाठी, आपल्या सुबत्तेसाठी, आपल्या स्वार्थासाठी मायबाप हे कृत्य करतात, त्याच्या परिणामांची तमा न बाळगता. तरुण मुलांची लग्न होत नाहीत, दररोज अनेक बलात्कार घडतात, या सर्व भयावह परिस्थितीकडे कवी कसे पाहतात बघा -
जन्म कुणी घ््यावा ना घ््यावा तू ठरवू लागला
हक्क कळ्यांचा फुलण्याचा तू नाकारू लागला
सृष्टिरहस्याचा तू साधक, कां बाधक ठरला?
प्रसंग तुजवर बुडण्याचा तू कां रे ओढवला?
पृथ्वीच्या पोटात घुसून, खनिजं, तेल, वायू, पाणी, सोनं, हिरे लुटणाऱ्यांना कवीने मुंगूस ही अनोखी प्रतिमा वापरली. स्त्रीभृणहत्या करणा-या अधमांना काय म्हणणार! कवी आपली लेखणी बाटवून घेऊ इच्छीत नाही. अशा अनेक विषयांना कवीने ओझरता स्पर्श केला आहे. काही विषयांकडे नुसता अंगुलिनिर्देश करून दिला, काही विषयांना अनुल्लेखाने मारले. या सर्वांतील कवींच्या विवेकी संयतपणाला दाद द्यावीच लागेल. या सर्व नतद्रष्टांमुळे सृष्टीचा, निसर्गाचा समतोल बिघडला आणि प्रतिबिंब बिंबाच्या अधिकाधिक झपाट्याने जवळ यायला लागले. प्रलय जवळ येऊ लागला. घाबरू नका-
तश्या या कवितेच्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टीही झाल्यातच की - गरज असेल तेथे कवीने अनेक रस, अलंकार, संधि, समास तर योजिलेच पण विज्ञानकवी असल्यामुळे काव्योघात खंड पडू न देता, सापेक्षता सिध्दांत, गुरूत्वाकर्षणाचा सिध्दांत, चुंबकीय तत्व या आणि अशा अनेक सिध्दांतांचा निर्देशही केला. न्यूटनगाणे, विज्ञानांगण, ज्ञानकन्हैया - ही यादी बरीच मोठी आहे - अशा कित्येक शब्दांनी मराठी शब्दभांडार अधिकच समृद्ध झाले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांप्रमाणेच शांतरसाची निर्मिती करणे हेच या कवीचे व कवितेचेही उद्दीष्ट आहे. प्रलयानंतरही कालांतराने नवजीवन निर्माण होणार आहे, हा आशावाद मानवाला देऊनच ही कविता अर्धविराम घेते.
"यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम ॥" भगवंतांनी अखिल मानवजातीला दिलेले हे आश्वासन अर्जुनाचे मन शांत करुन गेले.
'निसर्गकोपाचे हे पाणी ओसरेल कधीतरी
पुन्हा जमीनीवरती अंकुर, वृक्षराई गोजिरी
गतयुगातल्या गतचुका अता प्रलयी दे जाऊ
सुशील उदरी सदाशिवगृही पुन्हा जन्म घेऊ'
कवींचे हे आश्वासनही रसिकांचे मन एकदम शांत करून जाते.
अरुणने हा जो वाग्यज्ञ मांडला आहे, त्यात आपणही सामील होऊ या; स्वाहाकाराला जाऊ या!!
श्रीज्ञानेश्वरी हे श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य आहे. ज्ञानेश्वरीचे विवेचन करताना समोर निवृत्तीनाथ - ज्ञानदेवांचे गुरु नि बंधू बसले होते. त्यांना ज्ञानदेव म्हणाले - "तर्ही न्यून न पुरते । अधिकही सरते॥ आपण कृपाळू । होआवेजी॥"
(माझ्या विवेचनात काही कमी राहिले असेल तर तुम्ही भर घाला, मी काही जास्त बोलत असेल तर तुम्ही मला आवर घाला)
पृथ्वी गोल आहे. येऊन जाऊन मन पुन्हा 'मानवचंद्र' कडेच झेपावते. सृष्टीमध्येही गोलाकाराला प्राधान्य दिसते. आदिम अवस्थेत एकदा मानव टेकाडावर उभा असताना एक मोठा गोल दगड खाली घरंगळत असताना त्याला दिसला. त्याच्या लक्षात आले - आपले किती कष्ट गोलाकाराने वाचू शकतात - आणि मानवाला चाकाचा शोध लागला. आज सगळी यंत्रे चाकाच्या तत्वावर चालतात. अग्नीनंतर मानवाला चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवनालाही एकदम वेग आला. अॅमिबापासून मानवापर्यंत उत्क्रांती फारच संथ गतीने झालेली दिसते. पण चाकाच्या शोधामुळे गतिमान क्रांती केली असे कवी म्हणतात -
'थांबू न देई वर्तुळाकृती विचारचक्राला
चाक शोधुनी एके दिवशी, वेगवान झाला
चक्र फिरवुनी गोल गोल तू पुढे पुढे गेला
मुळातला तू कासव, आता जणू ससा झाला'
प्रत्येक मोठ्या शोधाचे वर्णन करताना कवीने सहजसुंदर उत्प्रेक्षा साधली आहे. चाकाइतकीच चाकाचे वर्णन करताना कवीची कल्पनाशक्तीही वेगाने धावते, बघा -
चतुष्पाद तू द्विपाद झाला, केवळ उत्क्रांती
द्विपाद तू चक्रारूढ झाला, अजोड ही क्रांती
काव्यौघात कठीण असा व्यतिरेक अलंकार कवींनी सहज साधला.
अद्भुत, भयानक, बीभत्स, वत्सल, करुण, शांत इत्यादी रस या काव्यात भरपूर प्रमाणात आपण आस्वादले. पण संस्कृत साहित्यात जो सर्वांत प्रमुख मानल्या गेला तो शृंगार रस आणि प्र. के. अत्रे ज्याला सर्वश्रेष्ठ रस मानावा असे म्हणतात- (कारण तो मानवी जीवनातील दुःखावरील रामबाण औषध आहे) तो हास्यरस या कवितेत अभावानेच आढळतो. हा नर्म शृंगार आहे कां बघा -
"गोल सूर्य नित्याचा, तैसा चंद्र पौर्णिमेचा
दगड जळी टाकता त्यात येणा-या वलयांचा
डोळ्यातील बुबुळांचा, गाली येणाऱ्या खळीचा
कुरळ्या कुरळ्या केसांच्या त्या सुंदर वळणांचा"
या रसग्रहणाच्या अंतिम चरणात आपण आदर्श काव्याची लक्षणे पाहू या -
१) शब्दप्रभुत्व - नवीन शब्दांची निर्मिती कवीने किती केली, संधि समास किती योजिले, यातून कवीचे शब्दप्रभुत्व दिसते. अनेकानेक संधिसमासांची आणि नवशब्दांची मनसोक्त पखरण ही कविता करते. विस्तारभयास्तव मी पुनरुक्ती टाळते.
२) अलंकारप्रचुरता - काव्यसुंदरीचे वैभव दिसले पाहिजे. अनुप्रास, यमक, श्लेष या तीन शब्दालंकारांसह उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती पासून तर व्यतिरेकापर्यंत अनेक अलंकार आपल्या काव्यसुंदरीवर कवींनी चढविले.
३) नवरसांची मेजवानी - 'वाक्यम् रसात्मकं काव्यम्' असे म्हणतात. अद्भुत, भयानक रसापासून, तर करुण, वत्सल आणि शांतरसाने ही कविता ओतप्रोत आहे.
४) शब्दाला तीन शक्ती - अभिज्ञा, व्यंजना, लक्षणा. अभिज्ञा म्हणजे शब्दार्थ (dictionary meaning). व्यंजना म्हणजे एकाच वेळी दोन अर्थ निघतात. सर्व अर्थालंकारात व्यंजना असते. उदा. उपमेय आणि उपमान. लक्षणा म्हणजे तिसराच अर्थ कवींना अभिप्रेत असतो. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते विं. दा. करंदीकर म्हणतात - "घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ््यावे", ढगांपासून आकार घ््यावे, नदीपासून प्रवाहीत्व घ््यावे इत्यादी. निसर्गातून कोणाकोणापासून काय काय घ््यावे, हे सांगितल्यानंतर कवी म्हणतात - देणा-याच्या हातातला दातृत्वाचा गुण घ््यावा. या कवितेत यमुनाजळ, बिंब-प्रतिबिंब, सुशीलउदरी या कडव्यांमध्ये लक्षणाच आहे.
५) सविकल्प समाधि - 'माहेरची साडी' पाहून रडत, पदराने डोळे पुसत थिएटरच्या बाहेर येताना अनेक महिलांना मी पाहिले आहे. आणि हाच सिनेमा ४० वेळा पाहिलेले रसीक, दर्दीही मला माहीत आहेत. काय खरे? साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात, एखादी उत्कृष्ट दर्जाची कलाकृती आस्वादताना रसीकाची 'सविकल्प समाधि' लागते. मी रसीक म्हणून वेगळा (विकल्प) आहे, हे मानून समोरच्या कलाकृतीशी तादात्म्य पावता आले तर ती कलाकृती आस्वादून मनात रसनिष्पत्ती होते. ह्यालाच न. चिं. चा 'सविकल्प समाधीचा चा सिध्दांत' म्हणतात.
६) ब्रह्मानंद सहोदर आनंद - सामान्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती होणे शक्य नाही. पण उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यापासून ब्रह्मानंदाचा सहोदर म्हणजे सख्खा भाऊ शोभेल अशा उच्च दर्जाच्या आनंदाची प्राप्ती होऊ शकते. उदा. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' किंवा 'आनंदे भरीन तिन्ही लोक' असे जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा हाच 'ब्रह्मानंद सहोदर आनंद' अभिप्रेत असतो. प्राचार्य राम शेवाळकर म्हणायचे 'पसायदानच फक्त ज्ञानदेवांनी लिहिले असते तरी खूप झाले असते.' कारण त्यात मानवाला ब्रह्मानंद सहोदर आनंद देण्याची क्षमता आहे.
७) कल्पनाशक्ती - जे न देखे रवी । ते देखे कवी॥ असे म्हणतात. रामाचा जन्म होण्यापूर्वीच कवी वाल्मिकींनी 'रामायण' रचले होते असे म्हणतात. कवीकल्पनेची भरारी उत्तुंग गरूड झेप घेते, तेव्हाच असे घडते. आग-याहून शिवाजीराजे बाळराजांसह कसे सुखरूप येऊन पोहचले, हे कवीच आपल्याला सांगू शकतो; इतिहासाला त्याचा पुरावा देता येत नाही.
८) नूरी - गुलाब हा फुलांचा राजा आहे, असे म्हणतात. पण पूर्ण फाकलेले गुलाबाचे फूल चांगले वाटत नाही, कारण मनाला ते विषण्णता देते. नूरी, म्हणजे अर्धस्फुट कळीच मनाला प्रसन्न करून जाते. तसेच कवितेचेही आहे. सूचकता हे कवितेचे मर्म आहे. अर्थगर्भता हा कवितेचा गाभा आहे. अर्थाचे फुलोर रसिकांनी फुलवायचे असतात. वानगीदाखल मी तुम्हाला प्रत्यक्षात घडून गेलेली एक गोष्ट सांगते -
अस्मादिकांना एम. ए. पार्ट टू - काव्याच्या पेपरला 'मर्ढेकर' नेमले होते; आणि प्रा. माणिक गोडघाटे, म्हणजेच कवी ग्रेस, तो पेपर शिकवीत होते. दोघेही गूढ कवी! किती समजले असेल आम्हाला? तुम्हीच कल्पना करा. या कवितेचे तसे होण्याचे काहीच कारण नाही. कारण 'मानवचंद्र' ही गूढ कविता नाही. ही एक सरळ निवेदनात्मक कविता आहे. तिच्यातून सरळ सरळ अर्थ काढता येतो.
९० वर्षांचे नामदेव महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण काव्यरचनेचे मूल्य जाणून म्हणाले -
'एक तरी ओवी अनुभवावी'. काव्य हा अनुभवण्याचा विषय आहे. त्याच धर्तीवर मला म्हणावेसे वाटते की डाॅ. अरुण मोहरीरांच्या काव्यातील 'मानवचंद्र' ही एकतरी कविता जाणकारांनी मुळातून अभ्यासावी म्हणजे कवी अरुण मोहरीर म्हणजे काय उंची आहे, हे तुम्हाला कळेल.
मी समीक्षकाच्या भूमिकेत नाही. या कवितेचे मूल्यमापन करण्याचा माझा मानसही नाही. पण आज मराठी कविता नवनवकवितेच्याही पुढे गेली आहे. मानवी जीवनाची ओंगळ बाजूच अत्यंत बटबटीतपणे वारंवार तरूण पिढीसमोर येत आहे. या साऱ्या वातावरणात 'मानवचंद्र' ही कविता मला वाळवंटातील 'ओअॅसिस' वाटली. म्हणून मी तिच्याकडे अंगुलिनिर्देश केला; एवढेच!
धन्यवाद !!
अस्तु !!!
विजया पारखी
१३ - १० - २०१५
-----------
दिव्यत्वाची जेथ प्रचीती । तेथे कर माझे जुळती
ब्रह्मदेव सृष्टीकर्ता, देवदेवता या अत्यंत पवित्र, सर्व मांगल्याच्या अधिष्ठात्री, व गणपती सर्व विद्याकलांचा अधिपती. चंद्र, सूर्य, ग्रहतारे, नक्षत्र हे सर्व नेहमीच माणसाला भुरळ घालत आले आहेत. त्यांच्याद्वारेच सर्व सृष्टीचे रक्षण, संरक्षण व पालनपरिपोष होतो आहे.
आपल्या सर्वच आध्यात्मिक ग्रंथात; भगवद्गीता, श्रीसूक्त, पुरूषसूक्त, अथर्वशीर्ष- या सर्वांमध्ये चंद्र-सूर्य यांचे वर्णन आले आहे. चंद्र-सूर्य हे अनंतकोटी ब्रह्मांडनायकांचे डोळे. एकच ब्रह्मांड नाही- अनंतकोटी. अनंत सूर्य, अनंत चंद्र. सर्वच अनंत. चंद्र-सूर्य हे जर डोळे तर ते सृष्टीकडे किती लक्ष ठेवून आहेत! मानवाच्या प्रगती व अधोगतीचा आलेख व सर्वांचे यथार्थ प्रक्षेपण जगन्नियंत्याप्रत नेहमीच पोहोचते आहे.
चंद्राची प्रभा आल्हादकारी, आनंद-वर्धिष्णु करणारी व शीतल, सोज्वळ, शुभ्र, शांत, वनस्पती परिपोष करणारी आहे. गणेशचतुर्थीला चंद्र पाहायचा नाही कारण उंदीर वाहन गणपतीचे, म्हणून चंद्र हासला होता. जो कोणी या दिवशी चंद्र पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल व तू कलाकलांनी क्षीण होत जाशील. असा गणपतीकडून त्याला शाप. मग उःशाप की तू कलाकलांनी वाढत जाशील.
प्रतिपदा ते पौर्णिमा - शुक्लपक्ष, प्रतिपदा ते अमावस्या - कृष्णपक्ष
गणपतीने चंद्राला कपाळी धारण केले म्हणून भालचंद्र हे नांव पडले.
सदाशिवाने चंद्राला डोक्यावर धारण केले. कारण समुद्रमंथनात जी चौदा रत्ने निघाली त्यात जहाल विषही होते. ते महादेवाने प्राशन केले. तो नीलकंठ झाला. थंडाव्यासाठी चंद्र, गंगा मस्तकावर व शेषनाग गळ्यात धारण केला. अशा अद्भुत वाटणाऱ्या कथा आहेत.
चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह, सूर्य स्वयंप्रकाशी, चंद्र परप्रकाशी. पंचांगशास्त्रात चंद्राचे फार महत्त्व. कोणत्याही शुभकार्याला चंद्रबल आहे की नाही हे पाहिले जाते. शुक्लपक्षातील द्वितीयेचा चंद्र पाहिला की खूप कल्याणकारी समजले जाते. पावसाळ्यात चंद्र दिसणे कठीण म्हणून दुर्बिणीतून पाहणारे लोक आहेत. विनायकी व संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडण्याची पद्धत आहे. शरदऋतूतील चंद्र चांदणे कवीमंडळींनी खूप उल्लेखिले आहे. करवा चौथ केली जाते. कोजागिरी पौर्णिमा मनवली जाते. त्यादिवशी केलेल्या बासुंदीत रात्री १२ वाजता चंद्रकिरण पडले की ते खूप उत्तम समजतात. भाऊबीजेला प्रत्येक स्त्री चंद्राला ओवाळते. चंद्र हा तिचा भाऊ, मुलांचा मामा.
राशीत चंद्र असणे म्हणजे शुभ, कुशल होणार हे ठरलेले. 'यावत् चंद्र दिवाकरौ' तुझी कीर्ती कायम राहो असा आशिर्वाद देण्याची प्रथा.
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
प्रतिपंच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
अर्थ: ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
श्रीराम चंद्रवंशी. चंद्रासाठी हट्ट.
दूज का चाँद मुसलमानांनाही प्रिय. ईदच्या महिन्यात उपवास.
Moon ने तर इंग्रजी काव्य व्यापलेले.
कविप्रतिभेला तर चंद्र-चांदण्या पाहून उधाण येते.
काढ सखे गळ्यातीत । तुझे चांदण्याचे हात - कुसुमाग्रज
तोच चंद्रमा नभात । तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप । तीच तूही कामिनी - गायक सुधीर फडके
चादंणे शिंपीत जाशी । चालता तू चंचले - वगैरे वगैरे
चांदोबा चांदोबा भागलास का । निंबोणीच्या झाडामागे लपलाय का ।
निंबोणीचे झाड करवंदी । मामाचा वाडा चिरेबंदी - वगैरे बालगीते प्रसिद्ध
चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं । जातवेदोऽम आवह ।
सूर्याम् हिरण्मयी लक्ष्मीं । जातवेदोऽम आवह ।। असे लक्ष्मीचे आवाहन
हे सर्व लिहायचे कारण चंद्रव्याप्त मानवी मन आहे.
अरुण, तुझ्या मानवचंद्राने अनेक विचार मनात जागृत केले. 'विज्ञान - शाप की वरदान' असा निबंधाचा विषय परीक्षेत हमखास येणार म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी सर्वच भाषांत हा विषय रटला-घोटला जायचा. चावून चोथा झालेला हा विषय. पण मोडक्या निलगिरीला जसे मोडक्या भागातूनच सायलीचे काटे पसरविल्यासारखे, मोराने पिसारा फुलविल्यासारखे तुरे-तुरंबे फुटतात तसेच या रूक्ष विषयाला तू जो फुलोरा दिलेला आहेस ते पाहून तोरंबून येते मन, तसेच तोरंबून येते शरीर!
निखालस नितळ, अर्थवाही, प्रवाही, ओघवती भाषाशैलीचे लेणे लेऊन, आशयसंपन्न, मार्मिक, आग्रही असे विचारांचे प्रतिपादन करून काव्यशिल्पाला मूर्तिमंत करण्याचे तुझे सामर्थ्य वादातीत आहे.
मानवचंद्राची प्रतिमा, शुक्लपक्ष-कृष्णपक्ष यातील तिथींच्या आधाराने तू केलेले वैज्ञानिकांचे स्मरण, बिब-प्रतिबिंब या संकल्पनातून तू व्यक्त केलेले तुझे मनोगत व 'महापूर हा, प्रलय असे, वा युगांत सांगा तुम्ही' हे तू वाचकांना केलेले आवाहन व उत्तराची अपेक्षा हे सर्वच लक्षणीय आहे. सत्ययुग, त्रेतापुग, द्वापारयुग, कलीयुग, प्रत्येक युगाचा अंत होणार आणि तो जलप्रलयानेच होणार, कारण पृथ्वी ३/४ पाण्यात आहे. पुनर्निर्मिती आहे कारण ब्रह्माला एकोऽहं बहुस्याम' व्हायचेच असते, व आत्मा अमर आहे. त्यामुळे युगांत वाटतो पण पुननिर्मिती होते. प्रतिभेचा महापूर, संवादी-विसंवादी विचारकल्लोळांचा प्रलय व एका शोधानंतर - झाले आता, सर्व संपले असे वाटतावाटताच कितीतरी शोधांचे निर्माण कार्य, ही प्रक्रिया युगानुयुगे चालतच राहणार आहे. आकाश अनंत आहे व पृथ्वी विपुल आहे आणि मानवी बुद्धीला काही परिसीमाच नाही. त्यामुळे निश्चिंत असावे.
अनावश्यक म्हणून वगळता येईल असे एकही कडवे कवितेत नाही. ही कला साधणे - 'हे तो नक्षत्रांचे देणे, देवदत्त लेणे'.
विजयाने केलेले मानवचंद्रचे रसग्रहण ऐकले. अभ्यासू व रसभरित विवेचन ऐकून आनंद झाला. सर्व मुद्दे त्यात आले आहेत. त्याच्याशी मी सहमत आहे. त्यामुळे पुनरुच्चार करत नाही. तिच्या लेखानंतर हा लेख पुरवणी म्हणून वाचावा अशी माझी अपेक्षा आहे.
एक गोष्ट आवर्जून कराविशी वाटते. मराठी भाषेचे संवर्धन तुझ्या हातून घडते आहे याचा खूप आनंद होतो. इंग्रजीच्या प्रभावाखाली मराठी भाषा गुदमरून जाते की काय अशी एक अवस्था निर्माण झाली होती. तिला जगविण्याचे T.V. वाहिन्यांपासून (५ मराठी वाहिन्या), सर्व मराठी प्रेमिकांनी खूप आटोकाट प्रयत्न केले. जगभर मराठी भाषिक आहेत. इंटरनेटद्वारे ते मराठी साहित्य, काव्य, नाट्य, यांचा आस्वाद घेत आहेत. 'सारेगमप' सारखे गायनाचे कार्यक्रम, साप्ताहिक भविष्य, दैनंदिन राशिभविष्य तर ते आवडीने पाहतातच पण मराठी बातम्याही ऐकतात. कुठेतरी चांगल्या लिखाणाची रूजवात करणे ही प्रक्रिया कलाकलांनी वाढवायला हवी. अजून प्रकर्षाने या गोष्टीकडे लक्ष दे.
'बारा शास्त्रज्ञ' हे पुस्तक प्रमोदला बक्षीस मिळाले होते. ते जीव हरपून वाचले होते. मेरी क्युरी व तिचा नवरा या दांपत्याने लावलेला 'रेडियम'चा शोध त्या दांपत्याला भूकतहान हरपून बसणारा वाटला होता. 'जगदीशचंद्र बोस', 'शांतीस्वरूप भटनागर', 'मित्रा' अवार्ड प्रमोदला मिळाले. कितीतरी शास्त्रज्ञ झाले, होतील आणि आहेतही. त्यांना दिलेली तुझी ही कृतज्ञ श्रद्धांजली मी समजते.
देवीच्या नवरात्रात ललितापंचमीला आपल्या घरी बाबा धार्मिक पुस्तकांची पूजा करायचे. शारदेचे आपण सर्वच उपासक आहोत. सरस्वतीचा वरदहस्त असणे यासारखी कृपा नाही.
'अनंत अमुची ध्येयासक्ती । अनतं अन् आशा
किनारा, तुला पामराला ।।' कविता - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कवी कुसुमाग्रज
कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. निरनिराळ्या IIT व वैज्ञानिक कार्यशाळा अखंड शोधप्रक्रिया चालू ठेवतच आहेत. नुकतीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) 'वेधशाळा' अंतराळात प्रक्षेपित केली. प्रत्येक क्षेत्रात मानवचंद्रांची कमी नाही. तुझ्या लिखाणाने त्यांचा शोध घ््यायचा एक सतत वेधच मला लागला आहे. 'मानवचंद्र'च ध्यानी-मनी येताहेत. जागृतू-स्वप्नी, सुषुप्तीत एकच निदिध्यास घेतला तर प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्ती होते म्हणतात.
तुझ्यासमोरचे कार्य तू खूप वाढवून ठेवले आहेस. तुझी ज्ञानपिपासा अमर्यादित आहे.
अमृतलाल वेगड नावाचे नर्मदा परिक्रमेचे साधक, उत्तम चित्रकार व लेखक आहेत. ते लहानपणापासून चित्रकला शिकण्यासाठी शांतिनिकेतन मधील प्रसिद्ध चित्रकार श्री. नंदलाल बोस यांच्याकडे गेले. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर ते आशिर्वादासाठी गुरूकडे गेले तेव्हा नंदलाल बोसांनी त्यांना 'बेटा, तुझं जीवन सफल न होवो' असा आशिर्वाद दिला. ते पुढे म्हणाले, 'सफल होणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. रोज त्यांची नावे वर्तमानपत्रातून छापून येत असतात. तू आपलं जीवन सार्थक कर.' समाजाकडून जेव्हा मी कमी घेतो व समाजाला अधिक देण्याचा प्रयत्न करतो ते जीवनाचे सार्थक आहे.
विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेत एक श्लोक आहे;
जीवने यावदादानम् स्यात् प्रदानम् ततोऽधिकम्
इत्येषा प्रार्थनाऽस्माकम् भगवन् परिपूर्यताम्
अर्थ: जीवनात समाजाकडून मला जेवढे मिळाले त्याहून अधिक मी समाजाला देईन, ही आमची प्रार्थना, हे भगवन् तू पूर्ण कर.
आपल्या येथे जो अधिक त्याग करतो तो श्रेष्ठ अशी धारणा होती. 'त्येन त्यक्तेन भुञ्जीथा' हे सूत्र जीवनाचा आधार असल्यामुळे; त्यागाधारित जीवनाचा गौरव असे मूल्य समाजात प्रतिष्ठित होते.
आपण बरेचदा दुहेरी निष्ठांचे बळी ठरत आहोत. अशी मूल्यें बाळगणाऱ्यांना आपण व्यक्तिगत जीवनात महत्त्व देतो, परंतु सार्वजनिक जीवनात उपभोगवादी व धनवंतांचाच उदो उदो होताना दिसतो. या दोगलेपणाला हद्दपार करणे आवश्यक आहे.
जगाच्या कल्याणा । संतांच्या विभूती । देह कष्टविती । उपकारे ।। - तुकाराम
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।। - ज्ञानेश्वर 'पसायदान'
'मानवचंद्र' हे कशाचाही हपाप न बाळगता विद्या-कलांची सेवा करत असतात. न्यूटनला त्याचे ज्ञान वाळूच्या एका कणासारखे वाटले होते. ज्ञान अनंत आहे. ते माणसाला निगर्वी, निरहंकारी बनविते. आर्किमिडीज वस्त्रांची तमा न बाळगता युरेका, युरेका म्हणून ओरडत स्नानगृहाबाहेर आला होता. चंद्रावर पदार्पण करणारा राकेश शर्मा! इंदिरा गांधीने 'भारत तिथून कसा दिसतो?' विचारल्यानंतर उत्तरला होता- 'सारे जहाँ से अच्छा!'
सत्यप्रिय युधिष्ठिर त्याच्या कुत्र्यासोबत स्वर्गद्वारापर्यंत पोहोचला होता. विवेकानंदांनी पुन्हा मानवजातीची सेवा करण्यासाठी जन्म मागितला होता. महात्मा गांधी पंचा नेसून वावरले व सत्याग्रहाची शक्ती इतकी दांडगी की त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून अशी व्यक्ती झाली यावर विश्वास बसणार नाही, पुढच्या पिढ्यांना!, असे इंग्रजांना म्हणावेसे वाटले. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच' असे म्हणणारे लोकमान्य टिळक इतके स्थितप्रज्ञ की मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर तुरूंगात 'गीतारहस्य' लिहू शकले.
मानवचंद्रांच्या गणतीला गिनती नाही.
संगीता मुकुंदराव पाटखेडकर
दि. १३ - १० - २०१५
------------
Reading poems from Balved was nostalgic for me. I reminisced my train travel with Prof. Moharir from Jalgaon to Mumbai, 2 years back, when I first heard them from him. Precious lessons of life put beautifully in words.
Manavchandra was recited by him to me at his residence. Reality put across in such a forthright manner. Hidden is the poet's happiness conveyed so subtly at the end.
The thought that crossed my mind on hearing them at that time was that, when all ends on earth and many centuries later, Martians (aliens) would begin their travel to earth and they would stumble upon 'Balved' and it would unfold to them all that was here.
On reading them once again now, my thoughts are on different line,
If all that Begins,
Has to End.
Then all that Ends,
Has to Begin!!
And 'Balved' would be that etincelle (spark) for this new beginning.
Just imagine, that first child getting his hands on to 'Balved'. His eyes would just grow wider and brighter with the joy of learning so much. Reading the book sitting on one of the branches of a huge tree, with the feel of the teacher being around. Close your eyes to look at the twinkle in his eyes as he finishes reading all the poems. Quite Possible!!!!
The New Beginning.......... the bar raised much higher then than when we began.
G Vijayalakshmi
11-10 - 2015
-----------
सर, तुम्ही सगळा व्याप सांभाळून एवढे लिखाण करता हेच खूप प्रेरणादायी आहे…
"बालवेद" हे नाव खूप नाविन्यपूर्ण आणि समर्पक आहे…
कावळ्याची, लाकूडतोड्याची, राजाची गोष्ट सगळ्यांच अंतर्मुख करणा-या आहेत…
बालवेद लहान-मोठे सर्वांनाच निश्चित आवडणार…
अनघा कुळकर्णी
-----------
बालवेद हा प्रौढवेध
कथामुर्तीला काव्याचे मखर घालून, शब्दफुलांची रांगोळी सजवून, अभिव्यक्तीचा गालीचा विणणे कवीला खूपच जमते, हे 'साध्यम् सिद्धम्' झाले आहे. आधीच्या दोन काव्यसंग्रहांनी ('उद्या लग्न आहे' व 'वाडा') याची चांगलीच चुणूक दाखविली आहे. वरताण झाला आहे 'बालवेद'. बालांसाठीच्या कथा मार्मिक जीवन दर्शन घडवून गेल्या आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे सर्व संस्कृतात आहे. सगळ्या विद्यांचे अधिपती गणपती आहे. 'बालवेद' ही संकल्पना अरुणला 'उद्या लग्न आहे' चे लिखाण चालू असतानाच स्फुरली. अरुण गद्यापेक्षा काव्यात जास्ती व्यक्त होतो. 'भगवद्गीता' संस्कृतात होती. सामान्य व्यक्तीपर्यंत ती व त्यातील आशय पोहोचविण्याचे कार्य ज्ञानेश्वरांनी केले. त्यांनी 'गीता' ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. त्या संदर्भातील त्यांचे लिखाण प्रसिद्धच आहे.
माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिके ।
परी अमृतातेहि पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।
अरुण सदाशिव मोहरीर या कवीने प्रचलित व स्वरचितही गोष्टी सुंदर मराठीचा परिवेष पांघरून बालवेदात लिहिल्या आहेत.
वेदात ऋचा व मंत्र असतात. त्यांचे सामर्थ्य त्रिकालाबाधित असते. त्यातील ऋचा व मंत्र इतके प्रभावी असतात की नुसते कानावर पडले तरी सामर्थ्य जाणवते. शाप-वरदान या संकल्पना त्यातच असतात. ऋषींची तपश्चर्या इतकी कठोर साधना करते की वेदांतील हे मंत्र त्यांचे व्यक्तीत्व अष्टसिद्धीच काय पण सारे विश्व बदलून टाकण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होऊ शकेल अशी किमया करून जाते. तुलना करावयाची नाही पण इतके जरूर जाणवते की बालवेद मध्ये ज्या एकवीस ऋचा आहेत त्या गणपतीला वाहिलेल्या जणू २१ दुर्वांची जुडी होऊन मंत्रभरित परिणाम करणाऱ्या झालेल्या आहेत.
'प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे' अाणि
'साध्याही विषयात अाशय कधी मोठा किती आढळे '
या दोन्ही उक्ती इथे सार्थ ठरतात;
जसे पीक मागे मृदा योग्य वेळ
ऋतू शब्दशेतीस हा बाल्यकाळ
१) बालवेद - ही पहिलीच कविता 'भुजंगप्रयात' वृत्तावरील कवीची लक्षणीय पकड तर जाणवून देतेच पण 'वृक्ष संस्कृतीचा' व 'द्रौपदीचे बुद्धीपात्र' या लक्षवेधी प्रतिमांनी चित्त आकर्षित करून घेणारी झाली आहे
२) रंग - या कवितेत शुभ्र, काळा, रंगित रंगांचे वर्णन करून काळा चष्मा मनातील दुष्ट भाव दिसू देत नाही, डोळ्यातले काजळ डोळे सुंदर बनवून मनातील काजळ लपविते, वगैरे विचारांची पखरण करता करता
खरा एक नी खोटा एक
संस्कृति सत्यासत्य विवेक
उडदाचे हे वरण आजीचे
नावडे जया असा न एक
अशा सुंदर ओळी कवी लिहून जातो. 'उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे' याची आठवण होते. खरे सांगायचे तर कितीतरी अवतरणे उद्धृत कराविशी वाटतात. एकूण काय, सर्वच विचार व लिखाणशैली मनोवेधक आहे.
३) उंदिर - कवितेविषयी लिहावे तितके थोडे आहे. गणपतिबाप्पांचे वाहन उंदिर! सगळ्या साधुसंतांना या उंदरावर लिहावेच लागले. कारण गणपति ही बुद्धीची देवता! सर्वात आधी या देवतेची पूजा मग उंदराला नाकारून कसे चालेल? हा उंदिर सहा विकारांचे प्रतीक असून वरदविनायकाने त्याला पायाशी स्थान देऊन त्याच्यावर आरूढ झाला, म्हणजे विकारांवर विजय मिळवा असा संदेश!
या कवितेत बाप्पा प्रसन्न होऊन त्याला इच्छावर देतात. बलाढ्य ढग होण्याची, डोंगर होण्याची इच्छा, पण डोंगराला उंदिर पोखरतो म्हणून पुन्हा उंदिर होण्याची इच्छा. 'अखंड इच्छापूर्तीचा वर श्राप असे बाप्पा' या नतिजापर्यंत येऊन पोहोचणारा उंदिर रेखाटला आहे. वर्णन खूपच सुंदर आहे. सर्वच कविता मुळातून वाचाव्या अशा आहेत. बालमनच काय पण माझ्यासारखी प्रौढ व्यक्ती त्या वर्णनात गुंतून पडते.
'जिथे हात लावीन तिथे सोने व्हावे' असा वर मागणाऱ्या मिडास राजाची गोष्ट आठवते. 'तू जितका धावशील तितकी जमीन तुझी' ऐकून त्यासाठी जीवतोड धावणाऱ्याला शेवटी साडेतीन हात जमीनच पुरे होते ही कथा आठवते. जे स्वतःजवळ आहे त्याचा यथायोग्य वापर करून दुसऱ्याजवळच्या गोष्टींचा हव्यास करू नये असा मार्मिक सल्ला! या कथेतून माणसाच्या लोभी प्रवृत्तीचा आविष्कार दर्शविला व त्यात तथ्य कसे नाही याची जाणीव करून दिली.
४) काऊचिऊ - चिऊचे घर मेणाचे, काऊचे घर शेणाचे, पावसाळ्यात काऊचे घर वाहून गेले. 'कावळा' सामान्य परिस्थितीतील माणसाचे प्रतीक. श्रीमंतीचे प्रतीक - चिमणीचे घर.
तिच्या दारी तो वाट पाहतो
हळूच दारकडी वाजवितो
शाई नखाला लावून घेतो
लोकशाहीची जयजय म्हणतो
मार्मिक भाष्य!
५) लाकुडतोड्या - श्रमजीवी माणसाचे प्रतीक, तीने मुले, त्यांना घडविण्याचे, कुऱ्हाड घेऊन देण्याचे स्वप्न. कुऱ्हाड विहिरीत पडते. रडतो. कोवळी डहाळी म्हणते 'जुने तोडतो, नवे जोडतो । जन्ममृत्यूचा पुण्य सोहळा'.
कवीला मधूनच अत्यंत मार्मिक भाष्य करण्याची सवय आहे. सुंदर विचारांनी संयुक्त असलेला हा 'बालवेद' कुणाला बरे आवडणार नाही? कवितेतील शब्दरचना मनाचा ठाव घेणारी आहे. सोन्याची, चांदीची, लोखंडाची कुऱ्हाड आग्रहाने त्याच्या स्वाधीन करून वृक्षदेवता लाकुडतोड्याला स्वतःवर घाव घालायला लावते. 'निस्पृह तू, तू संत मनाचा' असे त्याचे कौतुक करते. तीन मुलांना तीन कुऱ्हाडीचे वाटप. तीन मुलांच्या तीन कहाण्या चित्रगुप्त लिहिण्याला घेतो. सुंदर वर्णन! सोन्याची कुऱ्हाड दादाची, चांदीची भाऊची व लोखंडाची छोटूची. पिताभक्त व श्रमजीवी असणाऱ्या छोटूचे वर्णन खूपच सुरेख आहे. काय काय उद्धृत करू? मुळातून वाचा.
दादा सोन्याचे कडे बनवून गळ्यात घालतो. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारा आठवतो. भाऊ कुऱ्हाडीचा दांडा चितेत टाकून रूपेरी पाते घेऊन निघून जातो. 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' असे काहीसे आठवून जाते. छोटू त्याच्या बाबांचे आयुष्य गिरवतो. भाऊ विद्योपासक, ज्ञानी होतो. भाऊ विद्येचा उपयोग छोटूला वृक्षसंगोपनाचे शास्त्र शिकवून करतो. चोर दादाचे कडे चोरून त्याला वृक्षास टांगतात. पक्षी देहावर तुटून पडतात.
जन्मभरी कष्टाविण घास । सोनकड्याचा सुवर्ण फास!
एैसे वैभव लिहून भाळी । चित्रगुप्त दे स्वतःस टाळी ।
भाऊस, छोटूस मुभा देतसे । लिहा हवे ते स्वतः कपाळी ।
विद्याभ्यासी व श्रमजीवी लोक स्वतःचे आयुष्य स्वतःच घडवितात. स्वयंभू असतात. परावलंबी जीवन म्हणजे मरण हा संदेश!
किती रे लिहितोस अरुण? मी किती लिहू?
६) चंद्रिका - कलाकलांनी चंद्र मोठा व लहान होत जातो या कल्पनेवरील चंद्रिका ही कविता. वसंततिलका सारख्या कठिण वृत्तात बद्ध!
७) समुद्र - मूल मोठे होते, चिऊकाऊच्या गोष्टीत आता रमत नाही. 'हे राम' ने मीठ देणारी मशीन व 'पुरे मेल्या' ने थांबणारी. मशीन वापरून म्हातारीची उपजीविका, तिचा मुलगा छोटू 'हे राम' च्या करामतीवर परदेशाच्या बंगल्याचे इमले बांधतो. छोटू तिला परदेशी नेण्यासाठी बोटीत बसवितो. म्हातारीचा गळा दाबतो, तिचा श्वास कोंडतो व 'हे राम' शब्द ओठात येतात. बोटीवर मिठाचा ढीग साचतो. बोट बुडते, छोटू बुडतो, मशीन बुडते, तळाशी जाते. मशीन साखर देते, पाणी गोड होते. हे सगळे स्वप्न.
८) कावळा - मडक्यात दगड टाकून पाणी वर येते यावरील कथा. 'पण पाणी मडक्यात नसे तर व्यर्थ दगड टाकणे' हे मार्मिक भाष्य.
९) वाघ-शेळी - चाल रे भोपळ्या टुणूक टुणूक. उंदराच्या कल्पकतेने शेळ्यांचे रक्षण व वाघावर मात ही पारंपारिक कथा मुलांच्या आवडीची. वर्णनशैली आकर्षक.
वाघावर उंदिर आरूढ । शक्तीवर बुद्धीचा सूड।
शेळीची ऐसी खेळी । वाघाची झाली शेळी ।
'उंदिरशाहीस शह देणारा प्राणी कोणी नाही' हे भाष्य!
१०) माळी - व्यापाऱ्याने विश्व उभे करून तीन मुलांना मोठे केले. माळ्याने फळझाडे, फुलझाडे लावून एका मुलीस मोठे केले. व्यापाऱ्याला वैभव झोपू देईना. माळ्याने मुलीला त्याच्या क्षेत्रातील सर्व ज्ञान देऊन निश्चिंत मनाने देवाघरी गेला.
माळीण माळी माळी फुला
पुनः बहर आला
आंबा मोहरला
गंध जाईजुईला
नमन करी निसर्गकन्येला
व्यापारी एका मुलाशी लग्न कर अशी इच्छा करतो. सगळ्यात चांगल्या रोपट्याला मी बागफुलांची माळ घालते अशी ती उद्गारते. चार खड्डे बाबांनी खणले होते. एका खड्यात बाबांचा देह ठेवून त्यावर पिंपळाचे रोप लावले. तीन खड्डे तीन मुलांनी भरावयाचे आहेत. मोठ्याने माती ढकलून खड्डा बुजविला. मधल्याने पाचोळा भरून खड्डा भरला. एक फूल जुईचे घेऊन, धुंद गंध खड्यात व्यापून देऊन, छोटू स्वयंवर जिंकतो व यशस्वी माळी होतो. वृक्षसंगोपन, जमिनीची निगा, जंगलतोड वाचविणे व धन योग्य कामी लावणे हा संदेश. त्यालाही तीन मुली. त्यांना मोठे केले. म्हणजे वंशपरंपरागत वारसा चालणार हा विश्वास!
११) गाढव - छोटूच्या बुद्धीची कक्षा वाढते.
'ससा कासवाची शर्यत का कधी कुणी लावे'
दार उघडले तरी काऊ का चिऊच्या घरी मावे?' असे प्रश्न त्याला पडतात. व्यापारी साखरेच्या गोण्या गाढवाच्या पाठीवरून पलीकडील तीरावरील गिऱ्हाईकांसाठी पाठवतो. पावसाळ्यात थकून जाऊन गाढव पाण्यात बसते. उठून उभे राहते तो काय? पाठीवरचे वजन कमी झालेले.
नदीचे पाणी गोड लागता बुद्धीमान प्राणी
नदीतील हठयोगी साधूस देवतुल्य मानी
कथानकाचा गोडवाही मनावरील भार हलका करतो. हठयोगी बाबा व्यापाऱ्याला कापसाचा व्यापार करायला सांगतो. कापूसगाठीसकट पाण्यात गाढव बसताच त्याच्या पाठीवरील वजन खूपच वाढले. त्याला वठणीवर आणण्यात यश येऊन, व्यापाऱ्याचा पैसा खूप वाढून, नित्य हठयोग्याच्या पेटीतील लक्ष्मीची आवक वाढली.
आजी गोष्ट सांगते, पण आता हुशार झालेला छोटू 'पाणी गोड कां होते? कापूस वजनी कां होतो?' हे समजतो. हे गाढवाला कळले नाही म्हणून तो गाढव पण माणसासही कळले नाही म्हणून तो गाढवाधिगाढव!
बाबा तर बाबाची असती, काळे वा तांबडे
बिळावरी आयत्याच बसती, जय बाबा तांबडे
आजी छोटूला भौतिकी वा गणिताचा वापर करून गोष्टीतील अर्थ शतगुणित कर असे म्हणते. 'आयुष्याची शाळा माणसास घडवते' असे त्याला सांगते.
कथाविवरण बालमनाला त्यातील अर्थ शोधण्यास प्रवृत्त करणारे झाले आहे. कवीची शैली ओघवती नदीप्रमाणे मनाला पलीकडील तीरावर घेऊन जाणारी झाली आहे.
१२) गणित - कवितेतील राजकुमारी 'माझ्या दालनात दिवसा कोणी येऊ नये' असा हट्ट राजाजवळ करते. तशी राजाज्ञा होते. त्या काळात ती प्रजेत वावरून 'गणिता' या नावाने सामान्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेते. तिला गणित फार आवडते. लाकूडतोडाचा मुलगा गणू तिचा पट्टमित्र होतो. कवी लिहितो - 'गणिताची लाकडे लीलया तो फोडत होता'. १०० पैकी १०० गुण गणितात राजकन्येला हवेसे असायचे. ९९ गुण मिळाले तर तिने मौनव्रत धरले. राजवैद्य चिंतित! राज्यामध्ये दवंडी होते: तिचे मौनव्रत मोडणाऱ्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा! कुणाचीच मात्रा लागू पडत नाही. लाकुडतोड्याचा गणू येतो. त्याला कल्पना नसते हीच गणिता म्हणून. पण ती त्याला ओळखते. त्याला फक्त पाढे येत असतात. यावेळचे कवीचे वर्णन कवीला शब्दकला किती प्रसन्न आहे हे दर्शवितात. काही भाग मूळ कवितेतून वाचण्यातच आनंद मिळतो.
'पंचविस चौक' गणुने म्हणता, शब्द तोंडि येती'
'अर्धे राज्य नको हो बाबा, कशास भागाकार? गणुची आता गणिता राणी, बेरिज पूर्णाकार'
कविताही पूर्णाकाराने काठोकाठ भरते. ओसंडून वाहते. हसतखेळत गणिताची आवड मुलांच्या मनात निर्माण करण्याची कवीची खुबी वाखाणण्याजोगी आहे. 'शंभरपैकी शंभर' हा अट्टाहास ठेवल्याशिवाय परिपूर्णता येत नाही असे आवर्जून बिंबविणे हे मुलांच्या कोमल मनावर कायमचे ठसून जाते.
कवी खूप गोष्टीवेल्हाळ आहे. गोष्टींचा खजिना त्याच्याजवळ पुष्कळ आहे. बालसाहित्य कोणत्याच भाषेत कमी नाही. पंचतंत्र, हितोपदेश, अलीबाबा चाळीस चोर, चांदोबा, अरबी भाषेतील सुरस कथा वगैरे...वगैरे. कथांना अंत नाही आणि कविप्रतिभेला सर्व खजिन्याचे दरवाजे सताड उघडेच आहेत. 'तिळा दार उघड' म्हणण्याची गरज नाही. तो वळला आता ससा-कासवाच्या गोष्टीकडे!
१३) ससा-कासव - कथारचना खूपच वेधक! सशास शंभर पिल्ले व कासवाला पाच. कासवपिल्ले गंभीर, बुद्धी तीक्ष्ण. ससापुत्र प्रत्येक आळशी, भित्रा, पण चपळ. नेहमी कासव प्रथम येतात हे नावडण्याजोगे! शाळेत त्यांचे गुरूजी कोण तर घुबड!
प्रकाश, ध्वनिला, हवेस, नदीला वेगच कामी पडे
तयाचे आम्हाला द्या धडे? तयाचे द्या आम्हाला धडे
अशी विनवणी घुबड गुरूजींकडे ससा मंडळी करतात. शाळेभोवती दुसऱ्या दिवशी प्रदक्षिणेची शर्यत लावण्यात येईल असे गुरुजी सांगतात. काळ काम वेगाची गणिते पाटीवर सोडवून कासव सावकाश घरी येतात. त्यांचे आईबाबा गुरूला नमन करतात. दुसरे दिवशी शंखनाद होताच प्रदक्षिणा सुरू करण्याची सर्वाना आज्ञा होते. प्रदक्षिणा पूर्ण होताच पाटीवर रेघ ओढायची. १०० सशांच्या शंभर रेघा पाटीवर दिसतात पण कासव? त्यांच्या पाच पाट्यांवर काय?
'पाच परि कोऱ्याची राहती । पाच परि कोऱ्याची राहती ।'. कवीने अशा द्विरूक्तींचा कवितेत खूप सुंदर उपयोग करून घेतला आहे. आशय मनावर ठसविण्याचे काम तर होतेच पण कवितेला नादलय प्राप्त होऊन ठेका मिळतो व आशय सघन होतो.
१०० पाट्यांवर सशांच्या प्रत्येकी १२ रेघा होतात. त्यांना धाप लागते. ते थांबतात. त्यावेळी कासव १३ प्रदक्षिणा पूर्ण करून १३ दा पाटीवर रेघा ओढतात. तेव्हाच ते थांबतात. पराभूत ससे आज संथ घरी जातात.
कासवां नित्याचीच गती । कासवंा नित्याचीच गती ।
'शकुनीमामा पिल्लांना हे काय कानि सांगती तयांचे डोळे विस्फारती । तयांचे डोळे विस्फारती'
आपलीही उत्सुकता वाढते. आता प्रदक्षिणेची बुद्धीशी युती घालण्यात येते. काळकामवेगाचे गणित व नंतर प्रदक्षिणा. कासवमंडळी गणितही सोडवितात व प्रदक्षिणाही घालतात. गणितच न सुटल्यामुळे ससे पुन्हा पराभूत होतात.
वेगाचे वरदान ना परी काळ तुम्हा पाठिशी
निसर्ग देई दीर्घायुष्या, बुद्धिदान गाठिशी
काळ गुणा वेगास अापुल्या, काम धरा हाती
जगाला द्या त्याची प्रचिती । जगाला द्या त्याची प्रचिती
असा यशाचा मूलमंत्र आईबाबा त्यांना देतात. सुंदर भाष्य करण्यात अरुणचा हातखंडा आहे.
शंभरांना शकुनीमामा काय कानी सांगतो, याची वाचकांची उत्सुकता संपत नाही, पण कविता संपली आहे. हे कथाकथन कधीच संपणारे नाही. सतत स्पर्धा, कापट्य चालूच राहणार. त्याला अंत नाही. कौरव, पांडव, शकुनि मामा यांच्या संदर्भाने कविता खूप आणि खूपच सुंदर झाली आहे.
१४) पुंगीवाला - 'पुंगीवाला'तही नातवाला गणित शिकविण्याचा आजीचा प्रयत्न दिसतो. दहा हजार उंदीर खूप नासाडी घरोघरी करतात. पुंगीवाला मुषकराग आळवून उंदरांना नदीपार नेतो. काही बुडतात, काही वाहून जातात. कोणी पोहतात. आजी म्हणते ही खरी गोष्ट, मी स्वत: पाहिलेली. परत आलेले उंदिर मोठे होऊन अजूनच नासाडी करू लागले. पण तो पुंगीवाला न दिसल्यामुळे आजीच्या डोळा पाणी येते. समाजाची नासाडी करणारे लोक पुष्कळ असतात पण त्यांना आळा घालणारा एखादाच, हा संदेश बिंबवणारी ही कविता वाटता वाटताच आजोबांच्या फोटोकडे आजी पाहते व तिच्या डोळ्यातील पाणी पाहून नातू विचारतो, तुझ्या डोळ्यात धूळ गेली का? - हा संदर्भ करुणभाव मनात जागृत करतो.
१५) कवितावाचन - प्रत्येक मंत्र्याने काहीतरी हुन्नर दाखवून वाहवा मिळवावी अशी राजाची प्रजाहितासाठी योजना. नववा मंत्री होता कवितावाचक. आठ दिवस खचाखच गर्दी पण नवव्या दिवशी 'चार नि पाचच'. कवीची टवाळी उडविली आहे. चारोळ्या लिही - त्या लोकांना आवडतील, अशी राजाची सूचना! दीर्घ काव्य, खंडकाव्य, महाकाव्य कोणी वाचत नाही हा उपरोधपर उपहास!
कविमंत्र्याला ते जमले नाही. नवव्या दिवशी तरीही कुणीच आले नाही. कित्ती मजा! राजाने युक्ती लढविली. जे नवव्या दिवशी येऊन कवितावाचन ऐकतील त्यांना मोफत भोजन. काही दिवस प्रजाजन आले पण कवितेचे त्यांना अपचन झाले. कवीने कवितावाचनाच्या कार्यक्रमांची मस्त खिल्ली उडविली आहे. शेवटी तर राजाने कवितावाचनास बंदीच घातली. दवंडी झाली, कविमंत्री तडिपार झाला. लोकशाहीचा जयजयकार झाला. 'अता आठव्या दिवशी गायन । कधी पाच, कधि डोकी चार ।' इथे कविता संपते. पण गर्भितार्थ खूपच छान.
कलाकार्यक्रमांना उपस्थित राहून प्रजाजनांचे पोट भरत नाही. कलांसाठी द्यायला लोकांजवळ इतका वेळ नसतो. जीवन निर्वाहासाठी आततायी खटाटोप करणारे प्रजाजन कला समजण्याइतके प्रगल्भ नसतात. असाही एक अर्थ निघतो असे मला वाटते.
१६) न्याय - सर्व प्रजाजनांच्या तोंडी घास जावा म्हणून राजगृहातून रोज हजार झोळ्यांचे वाटप, भोज राजा, दहा मंत्र्यांकरवी करवीत असे. वेष बदलून राजा प्रजेत वावरे - रात्री. पण कोणी ना कोणी झोळी मिळाली नसल्याची तक्रार करी. राजाच्या मनाला घोर. प्रत्येक मंत्र्याला शंभर सुवर्णमुद्रा पेटीत टाकण्याची योजना राजाने सांगितली. तुमच्या झोळीत ज्या मुद्रा उरतील त्या तुमच्या, राजाच्या शुभेच्छा समजा. मी स्वत: मुद्रा मोजेन. पहिल्या मंत्र्याकडे पेटी, मुद्रा मोजून पुढच्याकडे. सातव्यावेळी १०१ मुद्रा पेटित पडल्या. सातवा मंत्रि चोर, राजा मौन. तो मंत्री काढून टाकून नवीन मंत्रिपरिषद राजाने नेमली.
काळ पुढे गेला. खापरपणतू राज्यावर आला. न्यायपेटीची सत्यपरिक्षा नेहमीच होते. आणि चोर असतोच. अशा कथांना अंत नाही. अकबर-बिरबलाच्या दुधाच्या हौदाची गोष्ट आठवते. प्रत्येकाने गडवाभर दुध हौदात टाकायचे. पण प्रत्येकजण विचार करतो, दुधात पाणी सामावते. म्हणून बरेचजण गडवाभर पाणीच टाकतात. पाणीदार दुधाचा हौद भरतो. भ्रष्टाचार चालतच राहणार. उदाहरणांना कमी नाही.
माणसाची स्वार्थी वृत्ती बदलणे कठीण आहे. आशयघन गोष्टी मुलांना सांगत राहिल्या तर बालमनावर खूपच चांगला परिणाम होतो. अरुणने अशा गोष्टीरूप कवितांच्या द्वारे हे कार्य चांगले साधले आहे.
१७) कोल्हा - कोल्ह्याच्या माळावर बकऱ्या चरायला जातात. रोज बकऱ्यांची संख्या कमी. डायनासोर जसे नष्ट झाले तसे जंगलात बकऱ्यांचे व्हायला लागले. बकरीजात नामशेष होऊन आता सशांची पाळी आली. कासवांनी कोल्ह्यांना धडा शिवविला.
घुबड गुरूजींच्या शाळेमध्ये ज्ञानसत्र चाले
कोल्ह्यांचे ते नश्वर आत्मे कुठे बरे गेले?
कोल्हा, बकरी, डायनासोर, ससा, कासव, घुबड या प्राणिजगताची ओळख देतादेताच मुलांच्या मनावर मार्मिक परिणाम घडविण्याचे कार्य छान!
१८) अंगुष्टिमाल - चांभाराच्या धंद्याला, स्वेटर विणणाऱ्या म्हातारीला, कुंभाराला, सर्वांच्या धंद्यात व्यापाऱ्याने पैसा गुंतविला. पण अंगुष्टिमालाने त्याला अंगठा दाखविला. व्यापाऱ्याने अंगुष्टिमालाचे देऊळ बांधायला घेतले व त्याला येण्याचे आवाहन केले. अंगुष्टिमालाने स्वतःची पूजा करवून घेतली, व्यापारी बघत बसला. व्यापाऱ्याच्या स्वार्थी वृत्तीचा निषेध व पाच बोटांचे, हाताचे महत्त्व या कथेद्वारे ठसविले.
१९) खोटं - खोटं बोलणाऱ्या मुलाची गोष्ट - सत्यबाबांनी नाकात एक थेंब रोज रात्री टाकायचा, प्रत्येक खोट्याला नाक वाढेल व त्याला ते दिसेल असे सांगितले. आजीचा सल्ला- असे करू नका. थोडी विनोद स्वरूपाने जाणारी कविता.
२०) ढमक ढमक ढम् - सर्वात सुंदर कविता, खूपच लक्षणीय वर्णन. मुलांचे चित्त गुंतवून ठेवणारे व त्यांची अखंड उत्सुकता ताणणारे.
मुळातून कविता वाचण्याचा माझा अत्याग्रह राहील. आटपाट नगराची उंच भिंत, अजिंक्य अजातशत्रू अभेद्य कोट. रोज रात्री नृपवेष त्यागून, प्रजाजनांचे दुःख समजावून घेण्यासाठी राजा निघतो. शांततेला चिरत चिरत काही ध्वनी त्याच्या कानी पडतो. नृपाला तो ध्वनी जणु चिडवितो. सगळे जण शीव गाठतात. कुणीतरी राजद्रोह करतो आहे, त्याला हत्तिपायी द्या. मनात भीति. शिपायाला उंच उचलून बळेच भिंतीवर चढवितात. समोरचे दृश्य पाहून, सगळे पाश तोडून, राजाला नमन करून तो पलिकडे उडी मारतो. राजाला क्रोध येतो. चौघड्यांचा ढमक ढमक ढम् आवाज चालूच.
दुसऱ्या शिपायाला पाठवितात. काय तुला दिसते ते सांग व अलिकडे ये म्हणतात. पण दुसरा शिपाईही पलीकडे उडी मारतो. राजाच्या मनात पाल चुकचुकते. खूप जण पलीकडे जातात. राजा व एक वृद्धच राहतो. राजाही चढतो आणि उडी मारतो. एकटा राहिलेला वृद्ध कसाबसा घरी येतो. एक चौघडा हाती घेऊन ढमक ढमक ढम् वाजवितो. ही कथा अंतहीन आहे. अंतहीनता हा या कथेचा शाप आहे असे कवी सांगतो. चौघडा लयीने कथेची गोडी वाढली व काव्य श्रेष्ठत्वास पोचले.
'जन्म मृत्यु होतसे । मृत्यु जन्म घेतसे
कुट्ट काळरात्र गर्भी । हा ध्वनि वसे'
असे कथाविश्लेषण कवी करतो. जन्ममृत्यूवरचे गूढ ज्ञान खूपच सुंदर रीतीने कवीने मुलांपर्यंत पोहोचविले आहे. कवीला प्रतिभेची लाभलेली ही देणगी अभेद्य ठरावी व त्याने नेहमी स्वतःतील कवीशी संवाद साधून काव्यदेवतेचा पाठपुरावा करावा व अतीव आनंदाचे धनी रसिकांना करावे!
२१) शंभर - ही पूर्ण कविता उल्लेखनीय. काऊचिऊच्या गोष्टींना नव्या पिढीपर्यंत पोचविणारी आई. हा वारसा आपल्या मुलीनेही चालवावा व त्यात अनेक नवनवीन कथांची भर घालावी अशी अपेक्षा करते. परंपरागत चालत आलेल्या अशा अनेकानेक गोष्टींनीच बालमन प्रगल्भ होत असते. त्याच्यात वाचनाची, चिंतन-मननाची, विद्येची आवड जोपासते व एक परिपूर्ण व्यक्तित्व तयार होते.
बा रे बालवेदा!
तुझ्या मनोविश्लेषणाचा मापदंड काय? मूलमंत्र काय?
मार्मिक की मूलग्राही की मूल्याधिष्ठित?
अमोल की अनमोल?
मनातीत की वेदातीत?
संगीता मुकुंदराव पाटखेडकर
दि. २९ - ९ - २०१५
-----------
सर्वच कवितांचे बेबीचे (संगीता पाटखेडकर) रसग्रहण छान झाले आहे. त्यात नवलही नाही. ती मराठीची विद्वान आहे. कविता बारकाईने वाचल्या म्हणून मला फार आनंद आहे. समजून उमजून वाचणारे आजकाल तसे कमी असतात. वर वर वाचून 'छान, उत्तम, like, 👍' म्हणण्याचा जमाना आहे. म्हणून कोणीतरी सखोल रसग्रहण करावे असे मला वाटत होते. आता तो contract बेबीला मिळाला आहे.
सर्वच कवितांचे मर्म बेबाबाईंच्या मुठीत आले आहे. माझ्या कवितेत नारदाचा खट्याळपणा असतो असे म्हणतात. मी तसा बंडच आहे. मला अभिप्रेत असलेल्या, व बेबीच्या रसग्रहणातून सुटलेल्या काही गोष्टी अश्या. आता कविता वाचल्या तर हे obvious वाटेल. बेबी म्हणते तसे गोष्टी बालांच्या असल्या तरी मर्म प्रौढांसाठी आहे.
रंग
सूर्यप्रकाशात अनेक रंग असतात. म्हणून तर इंद्रधनुष्य दिसते. जी वस्तू सगळे घटक रंग शोषते व एकही परावर्तित करीत नाही ती आपल्याला काळी दिसते. जी काहीच शोषत नाही व सगळे घटक परावर्तित करते ती आपल्याला पांढरी दिसते. जी वस्तू एक सोडून बाकी सगळे शोषते ती त्या रंगाची दिसते. या गोष्टीचा कवितेत वापर केला आहे. दिसते तसे नसते व सत्यासत्य भेद प्रत्येकाने आपला आपण करायचा असतो. आजीच्या गोष्टी नातवंडाना ही दृष्टी देतात.
पुंगीवाला
गोष्ट सत्य आहे असे आजी म्हणते. स्वातंत्यसैनिकांनी महत्प्रयासाने परकीयांना हाकलले. पण त्यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य ख-या अर्थाने आलेच नाही. आजोबांचा फोटो पाहून तिच्या डोळ्यात अजूनही पाणी येते. नातवाला मात्र ती नेहमीच डोळ्यात धूळ गेली म्हणून पाणी आले असे सांगून वेळ मारून नेते. आजची गोष्ट सांगतानाही तिच्या मनात पुंगीवाले आजोबाच आहेत. ते स्वतः स्वातंत्र्यलीर होते. ते खर्च झाले पण उपद्रवी मात्र बोकाळले.
शंभर
मुलीच्या दृष्टीनी तिची आईच अनुकरणीय आहे. म्हणून ती यादीत तिचे नाव घालते व तिचे अनुकरण करण्याचे वचन देते. 'आई' शिवाय बाकीच्या ९९ अनुकरणीय गोष्टींची यादी तिला अपूर्ण वाटते.
चिऊ काऊ
मधमाशांचे पोळे मेणाचे असते. मधमाशा म्हणजे इंग्रज असा कवितेत संकेत आहे. ते सोडून गेले व त्यांच्या जागी नवे राज्यकर्ते आले. पण सामान्य माणसाला काहीच फायदा झाला नाही. लोकशाही फक्त नावाचीच राहिली. पण काळ बदलेल आणि क्रांती होईल असा आशावाद कवितेत व्यक्त केला आहे.
कवितावाचन
राजा इतका दुष्ट आणि शक्तिशाली आहे की प्रजाजन उघड उघड बंड करू शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. म्हणून ते एका एका मंत्र्याला युक्तीने व अघोषित असहकाराने दूर करतात. आधी कवीची उचलबांगडी करतात. नंतर तीच युक्ती आठव्या मंत्र्यावर वापरतात. कवीची टिंगल केली आहे खरे पण राजेशाहीत सुद्धा लोकशाही जिंकू शकते असे मत व्यक्त केले आहे.
न्याय
जुन्या राजाच्या कारकिर्दीत दहामधे एक मंत्री चोर असतो. राजधर्मी राजा बरोबर त्याला काढतो. पण आज (खापरपणतूचे राज्य) मूल्ये इतकी बदलली आहेत की राजा जो एकच प्रामाणिक आहे त्यालाच काढतो. राजाच भ्रष्ट असेल तर न्यायव्यवस्था काय कामाची? नेहरू आणि राहुल गांधींवर कविता आहे असे काहींना वाटते. राहुलगांधीने अन्नसुरक्षा विधेयक आणले तेव्हा मी ही कविता लिहिली होती.
ढमक ढमक ढम्
पदस्पर्श वर अर्थश्लेश आहे. रामाचा पदस्पर्श अहिल्या शिळेला मुक्त करतो. जंतुकवीच्या तीन नवीन पदांचा कवितेला स्पर्श होताच अन्तहीनतेचा शाप असणारी गोष्ट मुक्त होते. गोष्ट अंतहीन आहे कारण सर्व जण भिंतीच्या पलिकडे जातात व म्हातारा इतडे ढमक ढमक वाजवतो. आता तिकडून इकडे लोक येतील व तिकडे एक उरेल. मग तो ढोल वाजवेल व जाणा-यांची फक्त दिशा बदलेल.
कावळा
तहानलेल्या कावळ्याची गोष्ट त्याच्या दृष्टीने सांगितला आहे. मडक्यात दगड टाकतांना त्याला जे प्रतिबिंब दिसते त्याला तो मडक्यातला काऊ म्हणतो. पाणी वर येऊन पितांना दोघांची चोच एकमेकाला लागते. यानी इकडून दगड टाकला की त्या कावळ्यानेही दगड टाकला असे याला वाटते. तेही प्रतिबिंबावरच आधारीत आहे. कावळा होऊन मी ही कविता लिहिली. काऊमामा!
खोटं
आजी पिनोशिओची गोष्ट वाचते. नंतर ती डोळ्यात औषध टाकते व तिचा डोळा लागतो. बाकी सर्व तिचे स्वप्न.
सत्यबाबांनी जो उपाय सुचवला तो आईबाबा आजीला सांगतात. आजी असा उपाय वापरू नये कारण सर्वच जण खोटं बोलतात असे सुचवते. तरी पण बाबा मुलाच्या नाकात थेंब टाकतात. पण आईवरही त्यांना संशय असतो म्हणून ती झोपली की तिच्या नाकातही टाकतात. तिलाही बाबांवर संशय असतो म्हणून ती वेळ पाहून त्यांच्या नाकातही टाकते. दुस-या दिवशी तिघेही वाढलेली नाके घेऊन घरी येतात कारण तिघेही खोटे बोलतात. नातवाला कारण कळत नाही. पण आईबाबा काय ते समजतात.
नंतर बेल वाजते व आजीचे स्वप्न मोडते.
अरुण सदाशिव मोहरीर
१ - १० - २०१५
-----------
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment